अडुसष्ट विरुद्ध एकशे एकाहत्तर !
रेल्वे अपघातांसंबंधी आकडेवारी केंद्राकडून प्रसिद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून गेल्या 20 वर्षांमध्ये झालेल्या रेल्वेअपघातांची आकडेवारी घोषित करण्यात आली आहे. 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कालावधीत दरवर्षी सरासरी 68 रेल्वेअपघात झाले आहेत. तर 2004 ते 2014 या मागच्या 10 वर्षांच्या कालावधीत प्रतिवर्ष सरासरी 171 च्या संख्येने रेल्वे अपघात घडले आहेत. 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काळात देशात काँग्रेसप्रणित सरकार होते. तर 2014 ते 2014 या काळात देशात भारतीय जनता पक्षप्रणित सरकार होते. सध्याही देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून या आघाडीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष हाच आहे. या पक्षाकडे 240 जागा आहेत.
केंद्र सरकारने आणखी काही वर्षांमधील रेल्वे अपघातांची संख्याही घोषित केली आहे. त्यानुसार 2000 ते 2001 या काळात 473, 2001 ते 2002 या काळात 415, 2002 ते 2003 या काळात 351, 2003 ते 2004 या काळात 325, 2004 ते 2005 या काळात 234, 2005 ते 2006 या काळात 234, 2006 ते 2007 या काळात 195, 2007 ते 2008 या काळात 194, 2008 ते 2009 या काळात 177, 2009 ते 2010 या काळात 165, 2010 ते 2011 या काळात 141, 2011 ते 2012 या काळात 131, 2012 ते 2013 या काळात 132, 2013 ते 2014 या काळात 118, 2014 ते 2015 या काळात 135, 2015 ते 2016 या काळात 107, 2016 ते 2017 या काळात 104, 2017 ते 2018 या काळात 73, 2018 ते 2019 या काळात 59, आणि 2019 ते 2020 या काळात 55 रेल्वे अपघात झालेले आहेत.
जगात चौथा क्रमांक
भारतातील रेल्वे यंत्रणा जगात चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी यंत्रणा आहे. भारताच्या आधी अमेरिका, रशिया आणि चीन यांचा क्रमांक लागतो. रेल्वे पायाभूत सुविधा विस्तार, रेल्वे यंत्रणा आधुनिकीकरण आणि रेल्वे व्यवस्थापन क्षमता वाढविणे या क्षेत्रांमध्ये भारताने गेल्या 10 वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर आकडेवारी
केंद्र सरकारने गेल्या 20 वर्षांमधील रेल्वे अपघाताची ही आकडेवारी सोमवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेल्वेअपघाताच्या पार्श्वभूमीवर सादर केली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वे अपघातांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने या दहा वर्षांच्या कालावधीत रेल्वे सुधारणांसाठी मोठा पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले आहे.