For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा नक्षलवाद्यांचे आज आत्मसमर्पण

06:36 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
सहा नक्षलवाद्यांचे आज आत्मसमर्पण
Advertisement

चिक्कमंगळूरसह मलनाड भागातील नक्षलवाद संपुष्टात येणार : 

Advertisement

कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या सहा नक्षलवाद्यांनी चिक्कमंगळूर जिल्हा प्रशासनासमोर बुधवारी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिक्कमंगळूरसह मलनाड भागात अनेक दशकांपासून धुमसत असलेला नक्षलवाद संपुष्टात येणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आज चिक्कमंगळूरमध्ये शरणागती होण्याची शक्यत आहे.

चिक्कमंगळूर जिल्ह्यातील मुंडगारु लता, वनजाक्षी, मंगळूर जिल्ह्यातील नक्षल नेत्या सुंदरी, केरळमधील जीश, तामिळनाडूतील वसंत के ऊर्फ रमेश आणि आंध्र प्रदेशातील मरेप्पा अरोली यांच्यासह सहा नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत. आत्मसमर्पण करण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी सरकारला म्हणजे शांती सिटीझन्स फोरम आणि नक्षल पुनर्वसन समितीला पत्र लिहून बेरोजगारांना रोजगार, त्यांची खोट्या खटल्यातून निर्दोष मुक्तता आणि विक्रमगौडा चकमक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

नक्षलवाद्यांच्या पत्राचा तपशील

आम्ही सहा जण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या सरकारांना पूर्ण संमतीने आणि एकमताने सदर पत्र लिहित आहोत. देशाची सद्य:स्थिती, चळवळींचे परिवर्तन, सामाजिक गरजा लक्षात घेऊन सशस्त्र संघर्षाचा मार्ग बदलून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात परत येणे चांगले आहे आणि याची शक्मयता आहे, अशी आपली खात्री आहे. आम्ही तणावमुक्त असून आम्हाला स्वेच्छेने मुख्य प्रवाहात यायचे आहे. पण याप्रकरणी आम्हाला सरकार आणि संबंधित समितीकडून काही स्पष्टीकरण हवे आहे, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

नक्षलवाद्यांचे स्पष्टीकरण

आपल्या मुख्य प्रवाहात येण्याची प्रक्रिया सन्माननीय असायला हवी. आमच्या स्वाभिमानाला कोणताही धक्का पोहोचणार नाही, असा कोणताही दबाव आपण लादू नये. आम्ही लढण्याची पद्धत बदलली आहे. मात्र, जनतेसाठीचा संघर्ष सोडणार नाही. त्यामुळे लोकशाही चळवळी आणि उपक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. आम्ही आमचे जीवन लोकांसाठी समर्पित केले आहे. आम्हाला लोकांच्या हितासाठी जगायचे आहे. येथून बाहेर पडून तुऊंगात सडण्याच्या मानसिकतेला आम्हाला सामोरे जायचे नाही. आमच्यावरील बहुतांश खटले हे खोटे आहेत, यात शंका नाही. आमचा कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणांमध्ये आमची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, असे नक्षलवाद्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणांतून आमची सुटका व्हावी

मुख्य प्रवाहात आल्यानंतर आमची त्वरित जामिनावर सुटका होण्यासाठी मदत करावी, सर्व खटले एकाच न्यायालयाच्या कक्षेत आणून जलद खटला चालवावा.

खटले चालवण्यासाठी कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.

आधीच मुख्य प्रवाहात आलेल्या अनेकांचे जीवन अधांतरी आहे. त्यांची प्रकरणे निकाली काढण्यासह त्यांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

हे पॅकेज वेगवेगळ्या तुऊंगात असलेल्या जोडीदारांनाही लागू केले जावे (जरी ते अटकेत असले तरीही) आणि त्यांच्या सुटकेसाठी सहकार्य करावे.

बाहेर आल्यानंतर, आपल्या जीवनाचा मार्ग काय आहे याबद्दल आपल्याला स्पष्टता आवश्यक आहे.

विक्रमगौडा यांच्या चकमकीतत हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी द्यावेत.

Advertisement
Tags :

.