चित्रदुर्ग जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात सहा ठार
कोल्हापूरच्या डीवायएसपी पी. वैष्णवी जखमी : मृतांमध्ये आईसह कारचालक अन् चार तरुणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
चित्रदुर्ग जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात चार तरुणांसह सहा जण जागीच ठार झाले. तमटकल्लू गावच्या ब्रिजजवळ कारने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर कार आणि कँटरमध्ये झालेल्या अपघातात चार तरुणांचा बळी गेला आहे. हिरियूर तालुक्मयाच्या हिंडसकट्टे गावाजवळ ही घटना घडली आहे.
तमटकल्लू जवळील अपघातात कोल्हापूरच्या डीवायएसपी वैष्णवी जखमी झाल्या असून त्यांची आई आणि कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. कमल हरिबाबू (वय 65) आणि कारचालक राकेश (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. जखमी डीवायएसपी वैष्णवी यांना उपचारासाठी चित्रदुर्गच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील डीवायएसपी वैष्णवी यांची इनोव्हा कार महाराष्ट्रातून बेंगळूरकडे जात होती. यावेळी कारचालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. परिणामी, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. याची माहिती मिळताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय भालचंद्र नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.
अन्य एका अपघातात चौघांचा मृत्यू
दुसरीकडे, कार आणि कँटर यांच्यात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. हिरियूर तालुक्मयाच्या हिंडसकट्टे गावाजवळ ही घटना घडली. बिदर-श्रीरंगपट्टन राज्य महामार्ग 150-ए वर हा भीषण अपघात झाला असून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
अपघातादरम्यान कारमधील लोकही विखुरले गेले आणि एका दिशेने पडले. यावेळी कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. विश्वनाथ (वय 22), नंजुंडी (वय 23), राहुल (वय 23) आणि यशवंत (वय 22) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत हिरियूर तालुक्मयातील नंजय्यनकोट्टीगे येथील रहिवासी असल्याचे समजते. हे सर्वजण हुळियारहून हिरियूरला येत होते. यावेळी समोरून आलेल्या कँटरने कारला जोराची धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच हिरियूर ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली