For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूरनजीक अपघातात सहाजण ठार

06:34 AM Dec 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूरनजीक अपघातात सहाजण ठार
Advertisement

कंटेनर दुभाजकाला धडकून कारवर उलटला : मृत मूळचे जत तालुक्यातील मोरबगी येथील

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकून समोरून येणाऱ्या कारवर उलटल्याने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सहाजण जागीच ठार झाले. बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याच्या नेलमंगल तालुक्यातील ताळेकेरे येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर शनिवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. ख्रिसमसची सुटी असल्याने आजारी असलेल्या वडिलांना पाहण्यासाठी हे कुटुंबीय गावी निघाले होते. मात्र, गावी पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

Advertisement

समोरील कारला बसणारी धडक चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर दुभाजकाला धडकून पलीकडून येणाऱ्या कारवर उलटला. कार (केए 01 एनडी 1536) पूर्णपणे कंटेनरच्या खाली सापडल्याने कारमधील सर्वजण जागीच ठार झाले. यात कारचा चक्काचूर झाला. उद्योजक चंद्रम येगप्पगोळ (वय 46), त्यांची पत्नी गौराबाई (वय 42), ग्यान (वय 16), दीक्षा (वय 12), आर्या (वय 6) विजयलक्ष्मी (वय 36) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ते मूळचे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे असून बेंगळूरमधील एचएसआर लेआऊट येथे वास्तव्यास होते. ख्रिसमसच्या सुटीमुळे ते आपल्या मूळ गावी आजारी असलेल्या वडिलांना पाहण्यासाठी कारने निघाले होते. यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. चंद्रम येगप्पगोळ हे आयएटीएस सॉफ्टवेअर कंपनीचे मालक होते. त्यांच्या कंपनीत 150 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

अपघातानंतर तातडीने घटनास्थळी क्रेन मागविण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर हटविण्यात आला. पोलिसांनी कारमधील मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवून दिले. कंटेनर चालकही गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघातानंतर तुमकूर-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहने हटविण्यात आल्यानंतर रहदारी पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली, अशी माहिती बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सी. के. बाबा यांनी दिली.

दोषींवर कारवाई करणार!

केंद्रीय विभागाचे आयजीपी लभूराम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातात दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तपासानंतर याविषयी स्पष्ट होईल, दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयजीपी लभूराम यांनी दिली. या अपघाताची नेलमंगल पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. तसेच प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास अधिकारी म्हणून नेलमंगल उपविभागाचे डीवायएसपी जगदीश यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.