आंध्रप्रदेशात भावासमोर बहिणीचे आव्हान
काँग्रेसकडून शर्मिला यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती : चालू वर्षात विधानसभा अन् लोकसभा निवडणूक
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशात चालू वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले वायएसआर यांच्या कन्या वाय.एस. शर्मिला यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आंध्रप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. रुद्र राजू यांनी सोमवारीच स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात काँग्रेसकडून वाय.एस. शर्मिला या त्यांच्या बहिणीकडे राज्यातील पक्षाची धुरा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शर्मिला यांनी अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत स्वत:चा वायएसआर तेलंगणा हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. शर्मिला आता आंध्रप्रदेशच्या राजकारणात काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ठरल्या आहेत. शर्मिला या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या तर वर्तमान मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या भगिनी आहेत. आंध्रप्रदेशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होणार आहे. शर्मिला यांच्या पुत्राचा लवकरच विवाह होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच शर्मिला यांनी माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना स्वत:च्या पुत्राच्या विवाहासाठी निमंत्रित केले होते. चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे.
2011 मध्ये जगनमोहन रे•ाr यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वायएसआर काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत 18 आमदारही काँग्रेसमधून बाहेर पडले होते. नवा पक्ष स्थापन केल्याच्या काही दिवसातच जगनमोहन यांना तुरुंगात जावे लागले होते. तेव्हा त्यांच्या आई वाय.एस. विजयम्मा आणि बहिण वाय.एस. शर्मिला यांनी नव्या पक्षाची धुरा सांभाळली होती. तर नोव्हेंबर 2021 मध्ये शर्मिला आणि जगनमोहन यांच्यात मतभेद निर्माण झाले हेते. यानंतर शर्मिला यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता.
शर्मिला यांच्याकडे नेतृत्व देत काँग्रेसने राज्यात पुन्हा स्वत:चा प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. आंध्रप्रदेश हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु तेलंगणाची निर्मितीनंतर काँग्रेसला आंध्रप्रदेशात स्वत:ची सत्ता टिकविता आली नव्हती. तेलंगणात अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळालेल्या उत्साहित काँग्रेस आता आंध्रप्रदेशात स्वत:चे अस्तित्व बळकट करू पाहत आहे.