‘सिंधूर अभियान...‘कुंकवा’चा सन्मान
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सज्जड प्रतिशोध
नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निर्दोष पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा पुरेपूर वचपा भारताने काढला आहे. बुधवारी भारतीय भूसेना, नौसेना आणि वायुसेना यांच्या संयुक्त कार्यवाहीत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या एकंदर 9 तळांना लक्ष्य करण्यात आले. भारताच्या या अचूक आणि नियमबद्ध हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची जबर हानी झाली असून कमीत कमी 100 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हल्ल्यानंतर संरक्षण विभागाने ही माहिती दिली. भारताच्या या अभिमानास्पद अभियानाला ‘ऑपरेशन सिंदूर‘ असे नाव दिले गेले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निर्दोष पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा पुरेपूर वचपा भारताने काढला आहे. बुधवारी भारतीय भूसेना आणि वायुसेना यांच्या संयुक्त कार्यवाहीत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या एकंदर 9 तळांना लक्ष्य करण्यात आले. भारताच्या या अचूक आणि नियमबद्ध हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची जबर हानी झाली असून कमीत कमी 100 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हल्ल्यानंतर संरक्षण विभागाने ही माहिती दिली. भारताच्या या अभिमानास्पद अभियानाला ‘ऑपरेशन सिंदूर‘ असे नाव दिले गेले आहे.
15 दिवसांनी प्रतिशोध
22 एप्रिलला झालेल्या त्या हल्ल्यात 25 भारतीय पर्यटक आणि 1 स्थानिक नागरीक असे 26 बळी गेले होते. सर्वात अपमानास्पद घटना म्हणजे, या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्याचा अमानवीय क्रूरपणा दहशतवाद्यांनी दाखविला होता. त्यानंतर 15 व्या दिवशी भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी अ•dयांवर क्षेपणास्त्र आणि वायुहल्ला करुन पुरेपूर प्रतिशोध घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 18 मिनिटे ते 2 वाजून 12 मिनिटे या कालावधीत भारताच्या भूसेनेने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी अ•dयांवर क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ले केले. त्याचवेळी भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा नेमका मारा करुन ते उध्वस्त केले आहेत. पाकिस्तानला पूर्णपणे बेसावध ठेवून हे अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय सेनादलांवर, आणि त्यांना कोणत्याही कार्यवाहीची पूर्ण मुभा देण्यासाठी भारत सरकारवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्या पर्यटकांना पहलगाम हल्ल्यात प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबियांनीही केंद्र सरकारच्या या कृतीवर समाधान व्यक्त केले असून सेनादले आणि सरकारला धन्यवाद दिले.
कोणते दहशतवादी तळ लक्ष्य...
- मर्कझ सुभानअल्ला- पाकिस्तानच्या बहावलपूर शहरानजीकचा हा तळ जैश ए मोहम्मद या संघटनेचा असून तो या संघटनेचे मुख्यालय म्हणून गणला जात होता. 6.5 एकरमध्ये पसरलेल्या या तळावर मशिदी, निवासी इमारती आणि इतर आस्थापने होती. या तळाचा संबंध 2019 च्या पुलवामा हल्ल्याशी होता.
- मर्कझ तैयबा- पाकिस्तानातील मुरिदकेमध्ये असलेल्या हा तळ लष्कर एक तोयबा संघटनेचा होता. या तळावर या दहशतवादी संघटनेच्या कारस्थानांचे केंद्र होते. येथेही मशिदी आणि दहशतवाद्यांसाठी निवासस्थाने होती. अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या योजना तयार करण्याचे काम या तळावरुन करण्यात येत होते.
- सरजर- पाकिस्तानातील तेहरा कलान येथील हा तळ लष्कर ए तोयबा या संघटनेचा असून तो बहावलपूर येथील तळानंतरचा सर्वात महत्वाचा होता. येथे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि संपर्क साधने यांचे प्रशिक्षण देण्याचे काम केले जात होते. हा तळ पूर्ण उध्वस्त झाल्याने या संघटनेची मोठी हानी झाली आहे.
- महमूना जोया- पाकिस्तानातील सियालकोट येथील हा तळ हिजबुद मुजाहिद्दीन या संघटनेचा होता. या संघटनेसाठी सर्वात महत्वाचा तळ अशी त्याची प्रसिद्धी होती. भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सराव या तळावर करण्यात आला होता. येथे दहशतवाद्यांच्या निवासासाठी व्यवस्था केली होती.
- मर्कझ अहले हाडिथ- पाकव्याप्त काश्मीरमधील हा सर्वात महत्वाचा दहशतवादी तळ असून तो लष्कर ए तोयबा या संघटनेचा होता. या संघटनेचे सर्व नियोजन आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर जे दहशतवादी हल्ले झाले, त्यांचे नियोजन या तळावरुन केले गेले अशी माहिती देण्यात आली आहे.
- मर्कझ अब्बास- पाकव्याप्त काश्मीरमधील हा तळ जैश ए मोहम्मद या संघटनेचा असून त्याचा उपयोग या संघटनेच्या दहशतवाद्यांची लपण्याची जागा म्हणून केला जात होता. या तळावर हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली आहे. हा तळ पूर्णत: उध्वस्त करण्यात आला आहे.
- मस्कर राहिल शहीद- पाकव्याप्त काश्मीरमधील हा तळ हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा असून त्यावर या संघटनेच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही या तळावर देण्यात येत होते. हाही तळ भारताच्या हल्ल्यात पूर्णत: नेस्तनाबूत करण्यात आला आहे.
- शवाई नल्ला- पाकव्याप्त काश्मीरमधील हा दहशतवादी तळ या संघटनेचे सर्वात महत्वाचे केंद्र म्हणून गणला जात होता. या संघटनेचे अधिकाधिक दहशतवादी याच तळावर वास्तव्यास होते. तो उध्वस्त करण्यात आल्याने या संघटनेची मोठी हानी झाली आहे. येथील अनेक दहशतवादी मारले केले आहेत.
- सिदना बिलाल- पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथील या तळावर जैश ए मोहम्मद या संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचे वास्तव्य होते. या तळावर भारताचा हल्ला होऊ शकत नाही, अशी पाकिस्तानची समजूत होती. तथापि, हाही तळ पूर्णत: नष्ट झाला असून अनेक दहशतवादी ठार झाले.
कसे साकारले ऑपरेशन सिंदूर...
ड वायुदल- भारतीय वायुदलाने राफेल विमानांमधून अत्याधुनिक ‘स्काल्प’ क्षेपणास्त्रांचा मारा करुन अनेक तळ उध्वस्त करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. हॅमर बाँबचाही उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
ड भूदल- भूदलाने भूमीवरुन भूमीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा उपयोग केला. या माऱ्यात पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तळ नष्ट झाले असून पाकिस्तानच्या रडार्सना चकवा देऊन ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.
ड नौदल- भारतीय नौदलानेही अरबी समुद्रातून आपल्या विनाशिकांमधून पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधील तळावर अचूक हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 तळांचा पूर्णत: सफाया झाला असून अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
मसूद अझरचे कुटुंब नष्ट
पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध दहशतवादी आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मसूद अझर यांचे संपूर्ण कुटुंब या भारताच्या हल्ल्यात मारले गेले आहे. त्याचा भाऊही ठार झाला असून त्याच्या कुटुंबातील एकंदर 10 माणसे ठार झाली. मात्र, अझर तेथे नसल्याने बचावला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे लक्ष
या संपूर्ण अभियानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रारंभापासून अखेरपर्यंत लक्ष ठेवून होते. त्यांच्या निवासस्थानातील विशेष कक्षात त्यांना या अभियानाच्या प्रत्येक क्षणाची माहिती दिली जात होती. अभियान 100 टक्के यशस्वी झाल्यानंतर त्यांनी स्वत: याची माहिती देशाला दिली आणि सेनादलांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी वेळात सेनादलांनी अचूक आणि अद्वितीय कामगिरी केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही घेण्यात आली होती.
पाकिस्तानला कसा दिला चकवा
आज बुधवारी भारताने नोटीस टू एअरमेन किंवा नोटॅमची घोषणा केली होती. तसेच सीमावर्ती भागात वायुदलाच्या युद्ध सरावाची घोषणा करण्यात आली होती. तसेच भारतातील 259 स्थानी सुरक्षा सराव केला जाईल, अशीही योजना घोषित केली होती. त्यामुळे आज बुधवारी भारत हल्ला करणार नाही, अशी पाकिस्तानची समजूत झाली होती. तथापि, बुधवारी मध्यरात्रीच हल्ला करण्यात आला. यामुळे पाकिस्तानला जागे होण्यासही वेळ मिळाला नाही, अशी स्थिती झाली.
किती दहशतवाद्यांना कंठस्नान...
भारताच्या या अचूक, आपल्या सीमेत राहूनच केलेल्या प्रतिशोधात्मक हल्ल्यात कमीतकमी 100 दहशतवादी ठार झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईक किंवा बालाकोट हल्ल्यापेक्षाही हे अभियान व्यापक, प्रभावी आणि अधिक विनाशकारी होते.