कोकण रेल्वेच्या विकासात सिंधुदुर्ग पोरका !
गोवा, कर्नाटकला झुकते माप ; रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकरांची टीका
त.भा.वार्ताहर
न्हावेली
कोकण रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचा सर्वाधिक फायदा गोवा,कर्नाटक आणि केरळ या राज्यांनी उचलला आहे.मात्र महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही मूलभूत रेल्वे सुविधांपासून वंचित राहिला असल्याचा गंभीर आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे.तळवडेकर म्हणाले की,शेजारील राज्यांना आधुनिक डेमू आणि मेमू गाड्यांचे जाळे मिळाले असताना सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांची हक्काची आणि स्वस्त दरातील पॅसेंजर सेवा मात्र हिरावून घेण्यात आली आहे.जिल्ह्यातून धावणाऱ्या तब्बल तीस गाड्यांना महत्वाच्या स्थानकांवर थांबा नाही .तरीही लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न धूसर होणे ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब असून यामुळे स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
टर्मिनस रखडल्याने रोजगारावर कुऱ्हाड !
सावंतवाडी टर्मिनस झाल्यास दळणवळण वाढून रिक्षाचालक, छोटे व्यवसायिक आणि हॉटेल उद्योगाला मोठा रोजगार मिळणार आहे.मोपा विमानतळ आणि शिरोडा ,आरोंदा भागातील पर्यटनासाठी सावंतवाडी हे महत्वाचे केंद्र ठरेल.मात्र, टर्मिनस अभावी हा आर्थिक फायदा जिल्ह्याच्या हातातून निसटत चालला आहे.
मुंबईतील चाकरमान्यांनी संघटित व्हावे ...
गणेशोत्सव,होळी आणि उन्हाळी सुट्टीत चाकरमान्यांची मोठी ससेहोलपट होते.सावंतवाडी टर्मिनस ही कोकणच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.केवळ स्थानिकांनीच नाही तर मुंबईतील चाकरमान्यांनीही आता संघटीत होऊन लोकप्रतिनीधींना या प्रश्नावर जाब विचारला पाहिजे. असे आवाहन सागर तळवडेकर यांनी केले आहे.