तेलंगणात बीआरएस विरोधात मूक क्रांती
भाजप राज्यात सत्तेवर येणार असल्याचा जी. किशन रेड्डी यांचा दावा
तेलंगणात सत्तारुढ बीआरएस विरोधात एक मूक क्रांती सुरू आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सरकार पराभूत होत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणार असल्याचा लोकांना विश्वास असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.
काही खोटे सर्वेक्षण अहवाल प्रसारित होऊनही भाजप उमेदवारांना मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक पक्षाच्या घोषणापत्रावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्देशांच्या आधारावर कर्नाटकातील काँग्रेस सरकार लोकांवर ‘तेलंगणा निवडणूक टॅक्स’ लावत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे.
राज्यात बीआरएस पक्षाच्या विरोधात एक मूक क्रांती घडून येणार आहे. लोक स्वेच्छेने स्वत:च्या गावांमध्ये बीआरएसच्या प्रचार वाहनांना प्रवेश नाकारत आहे. तेलंगणाच्या समस्यांवर एकमात्र उपाय म्हणजे राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार आणणे असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.
मतदार बीआरएस सरकारवर नाराज आहेत. कारण त्यांना दलित बंधू आणि बीसी बंधू यासारख्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. तसेच ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून निधी मिळणे बंद झाले आहे. तेलंगणात 18-35 वयोगटातील 60-70 टक्के लोक पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने असल्याचा दावा जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष केवळ आश्वासने देतो. कर्नाटक समवेत अन्य राज्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या गॅरंटींना अंमलात आणले गेले नसल्याची जाणीव लोकांना झाली आहे. काँग्रेस तेलंगणाच्या विकासाकरता प्रामाणिक नाही. तर भाजपकडून देण्यात आलेली आश्वासने पूर्ण केली जातात, हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.
केसीआर यांना हटवा, तेलंगणाला वाचवा अन् भाजपला जिंकवा असा नारा यावेळी रेड्डी यांनी दिला आहे. बीआरएस सरकार आणि यापूर्वीचे काँग्रेस सरकार भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहे. आता हे दोन्ही पक्ष आश्वासनांद्वारे लोकांची दिशाभूल करू पाहत आहेत असे भाजप नेत्याने म्हटले आहे.