आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्षाचा दुसरा सहामाही सुट्टीच्या हंगामामुळे सामान्यत: कमकुवत मानला जातो. अधिकचा खर्च आणि काही बाबतीत सुट्ट्यांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) आयटी क्षेत्रामध्ये मंदी दिसू शकते. मागणीच्या परिस्थितीवर आणि ग्राहकांच्या अंदाजपत्रकावरील स्पष्टतेवर बाजाराचे बारकाईने निरीक्षण केले जाईल परंतु जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या लोकप्रियतेवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.
टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो आणि एलटीआय माइंडट्री सारख्या लार्ज-कॅप आयटी सेवा कंपन्यांच्या महसुलात वाढ 1.5 ते 4.6 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची विश्लेषकांची अपेक्षा आहे. बहुतेक विश्लेषकांना वाटते की या तिमाहीत मिडकॅप कंपन्या लार्जकॅप कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी करतील असेही स्पष्ट केले आहे.
नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्चच्या एका नोटमध्ये म्हटले आहे की, ‘तंत्रज्ञान-केंद्रित उद्योगांमध्ये खर्चाचा दबाव वाढेल आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतींना वेग येईल. परिणामी, अल्पावधीत, ग्राहकांच्या आयटी बजेटमध्ये ऑटोमेशन आणि खर्च कमी करण्यावर भर दिसेल आणि मध्यम कालावधीत, भारतीय आयटी सेवा कंपन्यांसाठी परदेशात काम वाढेल.
बीएनपी परिबा सिक्युरिटीजचे कुमार राकेश यांनी त्यांच्या नोटमध्ये म्हटले आहे की ही तिमाही कदाचित या अनिश्चित चक्रातील शेवटची तिमाही असेल. ते म्हणाले, कोणतीही मोठी डील जाहीर न केल्यामुळे, ही तिमाही इतर तिमाहींच्या तुलनेत थोडी नरम आहे.