संसद अधिवेशनात राजकीय संघर्षाची चिन्हे
संविधानावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दिक ‘वॉर’ : खासदारांच्या शपथविधीला सुरुवात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात नवीन खासदारांना शपथग्रहण देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याचे संकेत दिसून आले. पहिल्या दिवशी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेत पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे, असे आवाहन केले. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक जागा गमावूनही मोदींचा अहंकार कमी झाला नसल्याचा हल्लाबोल केला.
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. सुरुवातीला सभागृहात राष्ट्रगीत वाजविल्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी, भाजप खासदार भर्तृहरी महताब यांना सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. सभागृह सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी शपथ घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव पुकारताच विरोधकांनी ‘नीट-नीट’, ‘शेम-शेम’ असे म्हणण्यास सुऊवात केली. तसेच नीट पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पंतप्रधानांनी केला आणीबाणीचा उल्लेख
संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा उल्लेख केला. 25 जून रोजी देशात आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असल्याचा दाखला देत हा दिवस अविस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. या दिवशी संविधान पूर्णपणे नाकारण्यात आले. भारताचे तुऊंगात रूपांतर झाले. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली असे स्पष्ट करत भविष्यात असे धाडस कोणीही करू शकणार नाही असा दावा केला. आपल्या जवळपास 15 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आणीबाणीव्यतिरिक्त संसदेची नवीन इमारत, नवीन खासदार, त्यांची जबाबदारी, विरोधकांची साथ, विकसित भारत याविषयीही भाष्य केले.
काँग्रेसने घेतला ‘समाचार’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा ‘समाचार’ घेतला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक जागा गमावूनही त्यांचा अहंकार दूर झालेला नाही. ते आणीबाणीची 100 वेळा पुनरावृत्ती करतील. आणीबाणी न लादता ते त्याच पद्धतीने काम करत आहेत. हा मुद्दा उपस्थित करून किती दिवस सरकार चालवणार? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच नीट परीक्षा गैरव्यवहार, मणिपूर हिंसाचार किंवा पश्चिम बंगाल रेल्वे अपघातावरूनही विविध प्रश्न उपस्थित केले.
प्रादेशिक भाषांमधूनही शपथग्रहण
18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम हिंदीतून शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या. केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी यांनी कन्नडमध्ये तर धर्मेंद्र प्रधान आणि जुआल ओरम यांनी ओरियामध्ये शपथ घेतली. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसामी भाषेत तर केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू आणि जी किशन रे•ाr यांनी तेलुगू भाषेत शपथ घेतली. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी गुजराती भाषेत शपथ घेतली. प्रतापराव जाधव यांनी मराठीतून तर डॉ. जितेंद्र सिंह यांनी डोगरी भाषेत शपथ घेतली. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी मल्याळममध्ये तर सुकांता मजुमदार यांनी बंगालीमध्ये शपथ घेतली. केंद्रीय मंत्री दुर्गादास उईके यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. हिंदीतून शपथ घेणाऱ्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक-महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महिला व बालविकासमंत्री अन्नपूर्णा देवी, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचा समावेश होता.