नोकर भरतीत 9 टक्के वाढीचे संकेत
भारतातील भरती प्रक्रियेमध्ये नोव्हेंबरमध्ये 10 टक्के वाढ झाली आहे. वर्षाच्या आधारावर ही वाढ झालेली असून 2025 मध्ये नोकर भरतीत 9 टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वर्ष 2025 मध्ये आयटी क्षेत्रामध्ये सर्वाधिक 15 टक्के इतकी उमेदवारांची भरती केली जाणार असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. या पाठोपाठ रिटेल आणि टेलिकॉम या आघाडीवरच्या क्षेत्रातील कंपन्यासुद्धा विविध स्तरावर उमेदवारांची भरती करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. नव्या वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये नोकर भरतीबाबत सकारात्मक चित्र दिसते आहे. भारतामध्ये विविध क्षेत्रांत होणाऱ्या नोकर भरतीचे प्रमाण 9 टक्के इतके राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासोबतच रिटेल क्षेत्र आणि दूरसंचार क्षेत्र तसेच इतर क्षेत्रात बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि विमा कंपन्यांच्या नोकर भरतीमध्ये यंदा उत्तम अशी वाढ पाहायला मिळणार आहे. एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात वर्षाच्या आधारावर पाहता नोकर भरतीमध्ये 10 टक्के इतकी वाढ झाली आहे. या आधीच्या महिन्याच्या तुलनेमध्ये भरतीमध्ये 3 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याच पद्धतीने नव्या वर्षातही नोकर भरतीचे प्रमाण वाढीव दिसून येणार आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व अधिक वाढीव असून या मार्फत नव्या व्यवसाय संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. भारतातल्या एकंदर विविध क्षेत्रातल्या नोकऱ्यांच्या प्रमाणात वाढीसाठी माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. निर्मिती कारखाने असतील, आरोग्य क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर पुढील काळात जोमाने केला जाणार आहे. याव्यतिरीक्त इतर क्षेत्रेही यांचा अवलंब करत नव्या नोकरीच्या संधी आजच्या तरुणांसाठी उपलब्ध करतील. आगामी काळात ई-कॉमर्स क्षेत्र असेल अथवा एचआर विभाग आणि डिजिटल सेवा क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढणार आहे. या क्षेत्रामध्ये पूर्णपणे तयार झालेल्या तज्ञांना, प्रशिक्षितांना अधिक मागणी असणार आहे. डिजिटल मार्केटिंग असेल किंवा जाहिरात व्यवस्थापन, एचआर या विभागातले तज्ञ नव्या वर्षी अधिक मागणीत असताना दिसतील.
एकंदर विविध क्षेत्रांच्या भरती संदर्भातली आकडेवारी पाहूया.
2025 मध्ये या क्षेत्रात असणार अंदाजे नोकर भरतीचे प्रमाण
आयटी किंवा माहिती तंत्रज्ञान 15 टक्के
रिटेल क्षेत्र 12 टक्के
दूरसंचार क्षेत्र 11 टक्के
वित्त संस्था आणि अकाउंटस् विभाग 8 टक्के
एचआर आणि अॅडमिन विभाग 7 टक्के
वरील आकडेवारी पाहिल्यावर सहज लक्षात येईल की आयटी हे नोकर भरती देण्यामध्ये यंदा आघाडीवर राहणार आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आणि मल्टी क्लाऊड सेंटर्सच्या देशभरात होणाऱ्या वाढत्या विस्तारामुळे यंदा आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या पाठोपाठ रिटेल क्षेत्रही नोकर भरती करण्यामध्ये अधिक आघाडी घेणार आहे हेही स्पष्ट होऊ लागले असून यंदा 12 टक्के इतकी नोकर भरती या क्षेत्रात होईल असे तज्ञांना वाटते आहे. रिटेल कंपन्या यंदा मोठ्या शहरांसोबतच टायर दोन आणि टायर तीन शहरांमध्ये सुद्धा आपली शोरूम्स उघडणार असून यामार्फत नव्याने उमेदवारांना भरतीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. या पाठोपाठ टेलिकॉम क्षेत्रसुद्धा उमेदवारांच्या भरतीसाठी पुढाकार घेताना दिसणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायासह सर्वच क्षेत्रात वाढतो आहे. 5जी तंत्रज्ञानासह दूरसंचार कंपन्या सज्ज झाल्या असून या क्षेत्रातील कंपन्यांकडून आगामी काळामध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची उप्लब्धता आजकाल दूरसंचार कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील तज्ञांकडून केला जात आहे.
मागच्या वर्षात नोकर भरतीचे प्रमाण 9 टक्के वाढीव राहिले असल्याचे समजते. नोकरी जॉबस्पीक यांनी ही माहिती दिली आहे. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या दोन क्षेत्रांनी मागच्या वर्षी अधिकाधिक उमेदवारांना नोकरी प्राप्त करुन दिली आहे. जवळपास या क्षेत्रात मागच्या वर्षी 36 टक्के नोकर भरती झाली आहे. यासोबतच तेल आणि वायू क्षेत्र, एफएमसीजी आणि आरोग्य क्षेत्रांनी नोकर भरती करण्यात पुढाकार घेतला होता, असेही नोकरी जॉबस्पीक यांनी म्हटले आहे. तेल व वायू क्षेत्रात नोकर भरतीचे प्रमाण 13 टक्के, एफएमसीजीत 12 टक्के आणि हेल्थकेअर क्षेत्रात 12 टक्के इतके भरतीचे प्रमाण राहिले होते. यातही भारतातील दक्षिण भारताचा वाटा नोकर भरतीत उंचावलेला दिसून आला.