सिद्धि कुमारींची संपत्तीच ठरली ‘अडचण’
प्रथम आत्या मग काँग्रेसने उघडला विरोधात मोर्चा
बिकानेर पूर्व मतदारसंघातील भाजप उमेदवार सिद्धि कुमारी यांच्यावरून राजकारण तापले आहे. काँग्रेसने त्यांच्या उमेदवारी अर्जात चुकीची माहिती नमूद असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी भेट घेत चौकशीची मागणी केली आहे. तर यापूर्वी संपत्ती वादावरून सिद्धि कुमारी यांच्या आत्या राजश्री यांनीही तक्रार केली आहे.
बिकानेर काँग्रेसच्या प्रभारी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या रितु चौधरी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार केली आहे. सिद्धि कुमारींचे प्रतिज्ञापत्र वादग्रस्त असल्याचा दावा करत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.
सिद्धि कुमारी यांच्या आत्या आणि राजघराण्याच्या पूर्वाश्रमीच्या सदस्य राजश्री यांनी संपत्ती वादावरून तक्रार केली होती. हा कौटुंबिक वाद आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यावरच बोलू शकणार असल्याचे सिद्धि कुमारी यांनी म्हटले. प्राचीन वास्तूंचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचा आरोप राजश्री यांनी केला होता.