सिद्धरामय्या हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री!
सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांचे वक्तव्य : मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मुख्यमंत्री बदलाविषयी कोणताही गेंधळ नाही. काँग्रेस हायकमांडने उघडपणे सांगितले नसले तरी सिग्नल दिला आहे. सिद्धरामय्या हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर राहतील, असे वक्तव्य विधानपरिषदेचे सदस्य आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यतिंद्र यांना कोपरखळी मारताना ‘हायकमांड’ची उपमा दिली आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस गोटात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
म्हैसूरमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना यतिंद्र सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना आमच्यात कोणताही गोंधळ नाही. फक्त प्रसारमाध्यमांवरच मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत आहे. सध्या सिद्धरामय्या यांनी खाली उतरविण्याची कुणाकडूनही मागणी झालेली नाही, असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहणार आहेत. काँग्रेस हायकमांडने याविषयी उघडपणे सांगितले नसले तरी त्यावर हिरवा कंदील दाखविला आहे. राज्यात सध्या नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवलेला नाही, असेही ते म्हणाले.
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणातील (मुडा) बेकायदा भूखंड वाटप प्रकरणी लोकप्रतिनिधी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, आम्हाला कायद्यावर विश्वास होता. आम्ही काहीही चूक केली नव्हती. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. स्नेहमयी कृष्ण यांनी लढा सुरू ठेवावा. कायदा सर्वांना सारखाच असतो. मुडा प्रकरणासंबंधी लोकायुक्त पथकाने दाखल केलेला बी रिपोर्ट न्यायालयाने मान्य केला आहे, असे त्यांनी सांगितले.
यतिंद्र सिद्धरामय्या हेच आमचे हायकमांड : शिवकुमार
विधानपरिषद सदस्य यतिंद्र सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाविषयी उघडपणे वक्तव्य केल्याने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांना टोमणा हाणला आहे. शुक्रवारी मंगळूर विमानळावर पत्रकारांशी ते बोलत होते. पत्रकारांनी यतिंद्र यांच्या वक्तव्याविषयी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिवकुमार म्हणाले, यतिंद्र यांनी हायकमांड असल्यासारखे विधान केल्याने आम्ही त्यांना हायकमांड म्हणून स्वीकारले पाहिजे. तेच आमचे हायकमांड आहेत. ते जे सांगतील त्याचा मी आदराने स्वीकार करतो, अशी खोचक टिप्पणी शिवकुमार यांनी केली.