श्री गणेशगीता महात्म्य
अध्याय पहिला
सुखाचा वर्षाव करणारा आणि मानवी जीवनातल्या दु:खांचा समूळ नायनाट करणारा गणपतीबाप्पा हा आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. सनातन हिंदू धर्मियांचे उपास्य दैवत श्रीगणेश आहे. प्रत्येक हिंदू धर्मियाच्या हृदयाच्या गाभाऱ्यात तो स्थानापन्न झालेला आहे. श्रीगणेशाला चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांची अधिष्ठात्री देवता मानतात. ऋग्वेदामध्ये श्रीगणेशाचा उल्लेख ब्रह्मणस्पती असा केलेला आहे. त्यातील दुसऱ्या मंडलातील तेविसाव्या सूक्ताचे नाव ब्रह्मणस्पतीसुक्त असे आहे. ऋग्वेदातील तेवीस ते पंचवीस ही सूत्ते श्रीगणेशाचे समग्र दर्शन घडवतात.
भगवान श्री व्यास महर्षीनी अठरा पुराणे आणि तितकीच उपपुराणे लिहिली आहेत. गणेशपुराण लिहिण्यापूर्वी व्यासमुनींनी श्रीगणेशाला वंदन केले, त्याची पूजा केली, स्तवन केले आणि श्रीगणेशपुराण लिहायला सुरवात केली. श्री गणेशपुराण हे एक उपपुराण आहे. श्रीगणेश हे परब्रह्माचे सगुण रूप आहे. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे.
श्रीगणेशस्तवन हा एक अखंड चालणारा ज्ञानयज्ञ आहे. ह्या ज्ञानयज्ञात केवळ विचारांचीच आहुती दिली जाते. श्रीगणेशाच्या चरित्ररेषा काहीशा अस्पष्ट आहेत परंतु श्री व्यासमहर्षींच्या अलौकिक प्रतिभेतून प्रकट झालेल्या ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या अक्षररेषा मात्र अत्यंत ठळक आहेत. निर्गुण निराकार परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीगणेशाचे अप्रतिम दर्शन केवळ ज्ञानमार्गानेच होते. आपण जेव्हा अत्यंत भक्तिभावाने आपले मस्तक श्रीगणेशाच्या पवित्र चरणावर ठेवतो तेव्हा श्रीगणेशाचे अतिसुंदर अशा सगुण रुपात दर्शन घडते. ज्ञानमार्गावरती व्यासकृपेने श्रीगणेशगीतेचे शीतल चांदणे पडलेले आहे.
श्रीगणेशाचे आपल्याला दिसणारे सगुण साकार रूप अतिशय नयनमनोहर आहे. श्रीगणेश अनेक रुपात नटलेला आहे. त्याच्याइतक्या विविध मुद्रा, विविध आकार इतर कुठल्याही देवाच्या प्रतिमेत सहसा आढळत नाहीत. भारतीयांच्या तनमनात श्रीगणेशाचे अतिभव्य रूप घर करून बसलेले आहे. कलावंतांना तर श्रीगणेशाचे वेडच असते. श्रीगणेशाचे सगुण, साकार रूप जेव्हढे मनाला मोहिनी घालते तेव्हढेच गणेशगीतेतून प्रकट होणारे त्याचे विचारधन मोहिनी घालणारे आहे. राजा वरेण्याला आयुष्य आनंदात कसे घालवायचे ह्याचे मार्गदर्शन श्रीगणेशाने गणेशगीतेतून केलेले आहे.
वरेण्यराजाने आणि त्याच्या पत्नीने श्रीगणेशाची तपस्या करून त्याला प्रसन्न करून घेतले होते. श्रीगणेशाने वर माग असे म्हंटल्यावर तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या असा वर मागितला. त्यावर तथास्तु असे बाप्पा म्हणाले.
पुढे उभयतांच्यापोटी बाप्पा गजमुखी आणि चार हाताच्या बालकाच्या रुपात जन्माला आले परंतु राजा त्यांना ओळखू शकला नाही. त्यामुळे त्याने त्या बालकाचा त्याग केला. माणूस आयुष्यात चालून आलेली संधी दवडतो आणि मग पश्चाताप करतो. सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी असलेल्या वरेण्यराजाला बाप्पांनी गणेशगीता सांगितलेली आहे. श्रीगणेश सिंदुरासुराच्या वधानंतर वरेण्यराजाला प्रत्यक्ष भेटले. ते ईश्वर आहेत हे उमगलेले असल्याने त्याने श्रीगणेशाना विनंती केली की, संसारात असंहनीय अशी खूप दु:खे मी भोगली असल्याने मोक्ष मिळण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मला कृपया मार्गदर्शन करा.
प्रत्येकालाच संसारात अनेक प्रकारची दु:खे सहन करावी लागतात आणि त्या दु:खापासून सुटका कशी करून घ्यावी हे कळत नसल्याने त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन श्रीगणेशाकडे राजाने मागितले आहे. गणेशगीतेच्या माध्यमातून श्रीगणेशानी हा उपदेश केलेला असल्याने तो सर्वांनाच उपयोगी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गणेशगीता खूप आवडते.
क्रमश: