मुंबईच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यर
वृत्तसंस्था/ मुंबई
विजय हजारे करंडक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी मुंबईने श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. नियमित कर्णधार शार्दुल ठाकुर दुखापतीमुळे बाहेर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनीत झालेल्या वनडे सामन्यावेळी अय्यरला प्लीहाची दुखापत झाली होती. त्यावर त्याला शस्त्रक्रियाही करवून घ्यावी लागली असून त्यातून सावरल्यानंतर तो विजय हजारे करंडक स्पर्धेतून पुनरागमन करीत आहे. ‘शार्दुलला दुखापत झाली असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आमच्याकडे शिवम दुबे व सूर्यकुमार यादव हेही उपलब्ध आहेत. पण श्रेयस अय्यरला उर्वरित सामन्यांसाठी मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे,’ असे मुंबईचे निवड समिती प्रमुख संजय पाटील म्हणाले. मात्र त्यांनी शार्दुलच्या दुखापतीचे स्वरूप काय आहे, याचे स्पष्टीकरण दिले नाही.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची वनडे मालिका होणार असून त्या संघाच्या उपकर्णधारपदी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. मात्र फिटनेसवर त्याचे खेळणे अवलंबून असेल. बडोदो येथे 11 जानेवारीपासून ही मालिका सुरू होणार आहे. उर्वरित दोन सामने 14 व 18 जानेवारी रोजी अनुक्रमे राजकोट व इंदोर येथे होणार आहेत. विजय हजारे करंडकमध्ये मुंबईचा पुढील सामना आज मंगळवारी हिमाचल प्रदेशविरुद्ध, त्यानंतर 8 जानेवारी रोजी पंजाबविरुद्ध होणार आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेची बाद फेरी12 ते 18 जानेवारी या कालावधीत बेंगळूरमध्ये होणार आहे.