रेशनकार्डच्या कामासाठी अल्प कालावधी
लाभार्थ्यांची निराशा : काम सुरळीत सुरू करण्याची मागणी
बेळगाव : रेशनकार्डच्या कामात अनियमितपणा असल्याने लाभार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. केवळ एक-दोन तासासाठी नवीन अर्ज स्वीकृती आणि दुरुस्तीच्या कामासाठी वेळ दिला जात आहे. त्यामुळे नव्याने अर्ज करणाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याबरोबर दुरुस्तीलादेखील कमी वेळ दिला जात असल्याने लाभार्थ्यांना रेशनकार्डपासून वंचितच रहावे लागत आहे. रेशनकार्डचे काम सुरळीत करावे, अशी मागणीही होत आहे. शुक्रवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज स्वीकृती सुरू होती. मात्र, बहुतांशी लाभार्थ्यांना याची माहितीच नव्हती. त्यामुळे काही लाभार्थ्यांनी दुपारनंतर गर्दी केली होती. मात्र, त्यांना निराश होऊन माघारी परतावे लागले. त्याबरोबर रेशनकार्डच्या दुरुस्तीसाठीदेखील दुपारी 12 ते 2 इतकाच वेळ देण्यात आला होता. त्यामध्येदेखील सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत होती. परिणामी लाभार्थ्यांना दुरुस्तीअभावी मागे फिरावे लागले. नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे.
त्याबरोबर रेशनकार्डमध्ये फेरफार करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, रेशनकार्डचे काम अनियमित असल्याने लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्डपासून वंचित रहावे लागत आहे. काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डची मागणी वाढली आहे. मात्र, शासनाकडूनच रेशनकार्डच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. शुक्रवारी केवळ दोन तास अर्ज स्वीकृती आणि दुरुस्तीच्या कामाला वेळ देण्यात आला. मात्र, यावेळी लाभार्थ्यांची कामे होऊ शकली नाहीत. शिवाय यामध्येदेखील सर्व्हर डाऊनची समस्या कायम होती. शिवाय शनिवारी पुन्हा बीपीएल अर्ज स्वीकृती आणि रेशनकार्ड दुरुस्तीचे काम दोन तास सुरू राहील, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. विशेषत: खासगी ऑनलाईन सेंटरवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, या कामासाठी वेळ वाढवून द्यावा आणि रेशनकार्डचे काम सुरळीत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
85 हजारांहून अधिक रेशनकार्डधारक प्रतीक्षेत
जिल्ह्यात 85 हजारांहून अधिक रेशनकार्डधारक प्रतीक्षेत आहेत. काहींनी दोन वर्षांपूर्वी रेशनकार्डसाठी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या हातात रेशनकार्ड मिळाले नाही. त्याबरोबर नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, कामाला स्थगिती मिळाल्याने केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे.