For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृक्षतोड न करता सुरुर-महाड रस्ता रुंदीकरण करणार, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची ग्वाही

05:12 PM May 04, 2025 IST | Snehal Patil
वृक्षतोड न करता सुरुर महाड रस्ता रुंदीकरण करणार  मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची ग्वाही
Advertisement

सुरुर-वाई-महाड रस्ता रुंदीकरण करताना बेसुमार वृक्षतोड सुरु

Advertisement

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि महामार्गाचे काम सुरु आहे. विशेषत: सुरुर-वाई-महाड रस्ता रुंदीकरण करताना बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. शेंद्रे ते कागल महामार्गाचे कामही निकृष्ठ पध्दतीने चालु आहे. याबाबत सामाजिक, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाव्दारे विविध मागण्या केल्या होत्या.

या मागण्यांची दखल घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुर-वाई-महाड रस्त्याचे रुंदीकरण वृक्षतोड न करण्याची ग्वाही दिली. तसेच महामार्ग ठेकेदाराला सूचना करत निकृष्ठ कामाकडे लक्ष देण्याचे, महामार्ग रुंदीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, पर्यावरण प्रेमी सुशांत मोरे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांबाबत असणाऱ्या त्रुटींबाबत, नियमबाह्य सुरु असलेल्या कामाबाबत मंत्री शिवेंद्रसिंह राजेंना निवेदन देऊन त्याकडे लक्ष वेधले. निवेदनात शेंद्रे (जि.सातारा ते कागल जि.कोल्हापूर) येथील राष्ट्रीय महामार्गाचे सुरु असलेले काम हे दर्जाहिन आहे. या कामाची निविदा ज्या ठेकेदाराला देण्यात आली आहे, त्याने प्रत्येक किलोमीटरवर सब ठेकेदार नेमले आहेत. हे काम करताना अनेक वृक्ष तोडण्यात आलेत. त्यासाठी संबंधीत विभागांची परवानगी घेतलेली नाही.

काम पूर्ण झालेल्या ठिकाणांचे नियमाप्रमाणे नवीन वृक्ष लागवड केलेली नाही. त्यामुळे वर्क ऑर्डरमधील अटी व शर्तीचा भंग झाला आहे. साताऱ्यातून कराडकडे बरेच जाणारे शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी येतात. त्यांना या कामामुळे नाहक त्रास होतो. बोरगाव, नागठाणे, उंब्रज येथील काम संथगतीने सुरु आहे. तसेच ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरले असून त्यामुळे भविष्यात दुर्घटना झाल्यास मोठी वित्त किंवा जिवित हानी होवू शकते.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाची निविदा रद्द करावी व फेर निविदा काढावी. संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. वाई-सुरूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून त्याअंतर्गत अनेक जुने, मोठे व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वृक्ष तोडले जात आहेत. ही वृक्षतोड त्वरित थांबवावी. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वाई तालुका महत्त्वाचा आहे. वारशाचे प्रतीक म्हणून येथे अनेक जुनी मंदिरे आहेत.

पाचगणी व महाबळेश्वर पर्यटनस्थळांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या परिसराचा निसर्ग व पर्यावरण संरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून कमी पाऊस, तीव्र उन्हाळ्यासह शेतीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करताना पर्यावरणस्नेही पर्याय निवडावेत व जुन्या वृक्षांची तोड थांबवावी. जिथे शक्य असेल तिथे रस्त्याचे मार्ग थोडे वळवून किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न व्हावा.

कोणत्याही प्रकारचे काम सुरु करताना आणि त्याचे निर्णय घेताना स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांना म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. अधिकारी आणि ठेकेदार यांचे आर्थिक लागेबांधे झाले असल्याने मंत्री महोदयांनी कारभार सुधारण्यासाठी कडक भूमिका घ्यावी. वृक्षतोड करण्यापूर्वी ठेकेदारांनी नवीन झाडे जगविण्याची जबाबदारी घ्यावी. झाडे जगवण्याचे काम ठेकेदाराने न केल्यास संबंधित ठेकेदाराला जास्तीत जास्त दंड ठोकून संबंधीत ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली होती.

"निवेदनाची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्काळ दखल घेत सुरुर-वाई-महाड रस्त्याचे रुंदीकरण वृक्षतोड न करता करण्याची ग्वाही दिली. शेंद्रे-कागल महामार्ग ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तातडीने हा प्रश्न मार्गी लावल्याने आता पर्यावरणाचे नुकसान टळणार आहे. तसेच महामार्गाचे कामाला गती येऊन त्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल."

  • सुशांत मोरे, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते
Advertisement
Tags :

.