अमरनाथ गुहेत शिवलिंग तयार
बीएसएफ जवानांनी घेतले दर्शन : 3 जुलैपासून यात्रेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ श्रीनगर
अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी शनिवारी बर्फाच्या शिवलिंगाचे (बाबा बर्फानी) पहिले फोटो सोशल मीडियावर समोर आले. या फोटोंमध्ये 6-7 फूट उंच शिवलिंग तयार झाल्याचे दिसत आहे. याप्रसंगी तेथे तैनात असलेल्या बीएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावर्षी, अमरनाथ यात्रा 3 जुलै 2026 रोजी सुरू होणार आहे.
अमरनाथ गुहा हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगेतील अमरनाथ पर्वतावर आहे. येथील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे. येथे 12 फुटांपर्यंत हिमवृष्टी झाली आहे. सध्या, मार्गावर सामान्य भागात 6 ते 8 फूट आणि हिमस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागात 10 ते 12 फूट बर्फ आहे. बाल्टाल मार्गावरील 9 किमी आणि नुनवान-पहलगाम मार्गावरील 8 किमी भागातील बर्फ हटवण्यात आला आहे. मार्ग 12 फुटांनी रुंद करणे, पृष्ठभाग सुधारणे आणि संरक्षक भिंती व मोऱ्या बांधण्याचे कामही सुरू आहे. यावर्षी, बेस कॅम्पवर तंबूंच्या जागी पूर्वनिर्मित आणि फायबर संरचना बांधल्या जात आहेत. यामुळे यात्रेकरूंना आरामदायक आणि आधुनिक निवासाची सोय मिळेल. तापमानातील अचानक घट आणि पावसाचा सामना करण्यासाठी फायबर संरचना प्रभावी ठरतील, असा दावा केला जात आहे. प्रत्येक इमारतीत 48 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीला लागून स्वच्छतागृह आणि गरम व थंड पाण्याची सोय आहे.
पूरप्रवण भागात छावण्या उभारण्यास मनाई
यावर्षी, सर्व संवेदनशील आणि आपत्तीप्रवण क्षेत्रे यात्रेकरूंसाठी ‘प्रवेशबंदी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. बाल्टाल आणि नुनवान या दोन्ही मार्गांवरील रस्ते रुंद करण्यात आले आहेत. पुलांचीही सुधारणा करण्यात आली आहे. ढगफुटी आणि अचानक येणाऱ्या पुराच्या धोक्यामुळे संवेदनशील भागांमध्ये छावण्या उभारण्यास मनाई करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी 3.6 लाखांहून अधिक नोंदणी
यावर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी 15 एप्रिल रोजी सुरू झाली. 5 ते 30 लोकांच्या गटात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी नोंदणी बुधवारी बंद झाली. तथापि, एकट्याने किंवा लहान गटांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंसाठी जागा उपलब्ध असेपर्यंत नोंदणी सुरू राहील. आतापर्यंत 3.6 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. ही यात्रा 3 जुलै रोजी बाल्टाल-सोनमर्ग आणि पारंपरिक नुनवान-पहलगाम मार्गांनी सुरू होईल. 57 दिवसांची ही यात्रा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि श्रावण पौर्णिमेला समाप्त होईल.