For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना-भाजप युती अन् राजकारण

06:06 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवसेना भाजप युती अन् राजकारण
Advertisement

शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील धुसफुस काही कमी होत नाही. एकीकडे एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा काही लपलेली नाही, त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असे भाकित केले आहे. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी बावनकुळे यांना फडणवीस हे 2080 पर्यंत मुख्यमंत्री राहिले तरी आम्हाला फरक पडत नसल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे महायुतीतील धुसफुस ही वाढतच असल्याचे दिसत आहे.

Advertisement

महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील सरकार हे डबल इंजिनचे सरकार असल्याचे भाजप नेते वारंवार बोलत असत, आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकार असल्याचे भाजप नेते बोलू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून कधी खातेवाटप, कधी मंत्रीमंडळातील संख्या तर कधी पालकमंत्री पदावऊन धुसफुस सुरू होती. आता सरकार स्थापन होऊन सहा महीने झाल्यावरही ही धुसफुस कायम आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, मात्र भाजपने त्यांची उपमुख्यमंत्री पदावर बोळवण केली, त्यांना पाहिजे असलेले गृहखातेही भाजपने शेवटपर्यंत शिंदे यांना दिले नाही. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मात्र भाजप आणि शिवसेनेत समन्वयाचा अभाव असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. नाशिक आणि रायगड या दोन्ही जिह्यात पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या मंत्र्यांना पाहिजे होते, मात्र या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीने पालकमंत्री नेमल्याने शिंदे हे नाराज झाले. अखेर या दोन जिह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली.

अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असे वाटत होते, शहा यांच्या दौऱ्यानंतरही याबाबतचा निर्णय झालेला नाही. निधीवाटपात शिवसेना आमदारांच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची अनेक आमदारांची तक्रार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची रायगड दौऱ्याच्या वेळी भेट घेतली होती, यावेळी शहा यांनी शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद देताना लवकरच सगळं काही ठीक होईल, असे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगळी टीम तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेगळी टीम काश्मीरमध्ये काम करताना दिसली.

Advertisement

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी धडाधड निर्णय घेताना एकनाथ शिंदे यांच्या काळातील अनेक योजनांना कट लावण्याचा सपाटाच लावला. एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजनेबाबतही सरकारकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात, काल तर मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2100 ऊपये देण्याचे आश्वासन कोणीही दिलेले नाही, तसेच लाडक्या बहिणी 1500 ऊपयांमध्ये खुश आहेत, असे वक्तव्य केल्याने महायुती सरकारला पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेची रक्कम 2100 ऊपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. उलट काही नावे वगळण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या अनेक योजनांबाबतच्या घोषणांबाबतंच हे सरकार आता कार्यवाही करताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेल्या अनेक योजनांबाबत आता चर्चाही होताना दिसत नाही. सर्वसामन्यांना सणाच्या काळात दिला जाणाऱ्या आनंदाचा शिधा असो किंवा मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तिर्थाटन योजना या दोन्ही योजनांचा आता कुठेच उल्लेख या सरकारमध्ये होताना दिसत नाही, तर दुसरीकडे मंत्री गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री असताना भाजपवासी झालेल्या नाईक यांची ताकद ओळखून भाजपचा गड असलेला ठाणे पुन्हा काबीज करण्यासाठी नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर जनता दरबार घेतला. दुसरीकडे ठाण्यात मिशन लोटसच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवक भाजप निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिंदे यांच्या होमग्राऊंडवरीलच त्यांची ताकद कमी करण्याची खेळी भाजपने सुरू केली आहे, मुंबईत तर शिंदे यांच्या शिवसेनेचा पाया कमकुवत असल्याने ठाणे महापालिका निवडणूक देखील शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. मुंबईत ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याने मोठा फटका हा शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे, ठाकरे बंधु एकत्र होण्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी दोन संपलेले पक्ष एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आनंदच आहे अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पाहुण्याच्या वहाणेने विंचु मरत असेल तर फडणवीस यांना आनंदच आहे, शिंदे यांची काम करण्याची पध्दत वेगळी आहे. सर्व प्रोटोकॉल झुगारत थेट जनतेत सहभागी होतात. मुख्यमंत्री असताना मुंबईतील झोपडपट्टी भागात जिथे आजपर्यत साधे मंत्री फिरकले नाहीत, त्या भागात मुख्यमंत्री रस्त्यावर झाडू घेऊन साफसफाईसाठी उतरल्याचे मुंबईत दिसले. तर विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना रागयडमध्ये झालेल्या ईर्शाळगड दुर्घटनेच्यावेळी दीड तास पायी प्रवास कऊन शिंदे हे घटनास्थळी पोहचले. ही एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पध्दतच त्यांची जमेची बाजू आहे, मात्र इतर मंत्र्यांना आणि नेत्यांना शिंदेंसारखे जमणार नाही. कारण तो पिंड असावा लागतो आणि शिंदे यांचा तो पिंड असल्यानेच शिंदे हे कायम प्रभावी ठरत आले आहेत. त्यामुळे आजही जनतेच्या मनातील शिंदे यांचे स्थान कमी होताना दिसत नाही, मात्र सरकारमधील त्यांचे स्थान कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.