शिदोरी
कोणे एकेकाळी गावाला जाण्याचे कुटुंबाला अप्रूप असायचे. पण गावाला जाणे सहज शक्य नव्हते. त्यासाठी काहीतरी प्रयोजन लागायचे. त्यासाठीचे नियोजनही कष्टदायी होते. वाहनव्यवस्था सुलभ नव्हती. शिवाय रस्त्यात जंगल, वन्य श्वापदे, मोठ्या नद्या, तब्येतीची काळजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाण्याची सोय करणे. कारण वाटेत कुठेही खायला मिळण्याची शक्यता नव्हती. विहीर, नदी, झरा, ओढा यांचे पाणी पिता येत होते परंतु भुकेसाठी शिदोरी आवश्यक होती. दीर्घकाळ टिकणारे फराळाचे पदार्थ स्त्रिया मेहनत करून तयार करत. त्यांचे डबे भरून सोबत असायचे. प्रवास काही सोपा नव्हता. तरी देखील गावाला जाण्याची माणसाला असणारी निसर्गदत्त ओढ मनात आनंद फुलवत असे. तीर्थयात्रेला गेलेली मंडळी परतून येण्याची खात्री नसली तरीही त्यांना घरून विरोध नसायचा. गावाला जाणे आणि शिदोरी यांचे जसे अतूट नाते होते तसेच गावातच दूर ठिकाणी जाताना किंवा शेतात राबताना शिदोरीशिवाय पर्यायच नव्हता. ‘भूक नसो पण शिदोरी असो’ ही म्हण त्यावरूनच पडली असावी.
गोपाळकाला हा आबालवृद्धांचा अतिशय आवडीचा प्रसाद म्हणजे शिदोरीच आहे. समृद्ध गोधन दूर पर्वतावर हिरव्या रानी चरायला नेताना सारे गोपाळ आणि गोपाळकृष्ण मातेने बरोबर दिलेली शिदोरी नेत आणि त्याचा काला करत. खेळून, दमून, गाईंना चरायला लावून भुकेची जाणीव झाली की सगळे गोपाळ कदंब वृक्षाखाली एकत्र येत आणि आपापल्या शिदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत. कृष्ण मग काय करीत असे तर संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘शिळ्या विटक्या भाकरी, दहिभात लोणी मेळवोनी, मेळा करी चक्रपाणी’. कुणाची शिळी भाकरी, चटणी कांदा कुणाचा, दहिभात, कुणाचे लोणचे तर कुणाचे लोणी. कृष्ण आपल्या हाताने सर्व शिदोऱ्या एकत्र करी आणि तो अमृतकाला स्वत:च्या हाताने एकेकाला भरवत असे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ। ठकविले त्याने ब्रम्हादी सकळ?’ गोपाळकाला म्हणजे समतेचा परमोच्च बिंदू आहे. त्यात गरीब, श्रीमंत हा भेदभाव नाही. उच्च, नीच हा तर प्रश्नच नाही. कृष्णाकडून मिळालेल्या काल्यातला एक एक घास गोप बालकांनी कृष्णालाही भरवला. गोकुळवासियांचे हे मोठे भाग्य. हा सगळा शिदोरीचा महिमा. नाथ म्हणतात, ‘वैकुंठीचा हरी गोपवेष धरी, घेऊनी शिदोरी जाय वना’. गोपाळकाला हा कुण्या एकट्याचा नसतो, तर त्यात प्रत्येक हरीभक्त आपला वाटा घालत असतो.
नवी नवरी सासरी जाताना तिला फराळाच्या पदार्थांची शिदोरी देतात. परिसरातले ओळखीचे लोक शिदोरीचा आस्वाद घ्यायला एकत्र येतात. ज्याप्रमाणे गावाला जाताना भूक लाडू, तहान लाडू म्हणून शिदोरी नेतात. त्याचप्रमाणे कुणाच्या घरी जाताना ऐपतीप्रमाणे शिदोरी नेण्याची पद्धत आहे. आपला परममित्र कृष्णासाठी दारिद्र्याने गांजलेल्या सुदाम्याने आणलेल्या पोह्याची शिदोरी भक्तांच्या काळजात तेवती आहे. कृष्ण त्रैलोक्याचा स्वामी. त्याला काय द्यायचे? परंतु भक्तांनी प्रेमाने दिलेला एक पाण्याचा थेंब त्याला अधिक आनंद देतो. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात, ‘हे सांगावे काय किरीटी। तुवाची देखिले आपुलिया दिठी । मी सुदाम्याचिया सोडी गाठी । पव्हयालागी’ अरे अर्जुना मी तुला काय सांगू? सुदामा हा माझा वर्गमित्र जेव्हा मला भेटायला आला तेव्हा त्याच्या खांद्यावर एक पोह्याची लहानशी पोटली होती. घरात अठराविश्व दारिद्र्या होते. शेजारी मागून त्याने थोडे पोहे आणले होते. अरे, त्या पोह्यासाठी मी त्या गाठोड्याच्या गाठी भराभर सोडल्या कारण कृष्ण फक्त भक्ती जाणतो. लहान, थोर तो जाणत नाही. तो भावाचा पाहुणा आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत की देवाच्या दर्शनाला जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रसाद देवासाठी न्यावा. प्रेमभराने अर्पण केलेली शिदोरी देवाला प्रिय आहे.
जन्माला आलेला प्रत्येक जीव हा भूलोकीचा प्रवासी आहे. जन्माला येतानाच मृत्यूचे अर्थात परतीच्या प्रवासाचे तिकीट परमेश्वराने त्याच्या संचितात ठेवले आहे. देवाघरी जाण्याचा दिवस, वेळ तसेच निरोपाच्या वेळी उपस्थित असणारी मंडळी हे सारे ठरलेले आहे. परंतु आयुष्यात माणसाला त्याचा विसर पडतो. तो चिरंजीवी थाटात मृत्यूचे भान न ठेवता जगत असतो आणि एक दिवस अकस्मात परलोकीचे दूत त्याला न्यायला येतात. त्यावेळी त्याचे काहीही नियोजन नसल्याने देवाच्या गावी जाताना तो शिदोरीशिवायच जातो. परमेश्वराच्या गावी, चित्रगुप्ताच्या दरबारी जेव्हा जिवाचा जमाखर्च मांडला जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संत मंडळींनी वेळोवेळी, परोपरीने, कळकळीने सांगून दिलेली नामस्मरण शिदोरी घ्यायला जिवाला वेळच मिळालेला नसतो. शिदोरी म्हणजे खाण्याचे पदार्थ असे समीकरण मनात पक्के ठसलेले असते. संतांच्या मनात मात्र देवाच्या गावाला जाणारी वाट सुकर, सहज करणारी आणि देवाला अर्पण करणारी निराळी शिदोरी असते. परमेश्वर त्याच्या गावी पोचणाऱ्या भक्तांची वाट बघत असतो. त्याला उत्सुकता असते की त्यांच्याजवळ कोणती शिदोरी आहे? प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी दिलेल्या ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राची की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राची? ‘हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’ असे कळकळून सांगणारे ज्ञानोबा माऊली, ‘जय जय राम कृष्ण हरी’ म्हणणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ‘गण गण गणात बोते’ म्हणणारे शेगावीचे संत गजानन महाराज, ‘जयजय रघुवीर समर्थ’ म्हणत भयनाशाची युक्ती सांगणारे समर्थ रामदास स्वामी. भगवंताच्या नामाची शिदोरी घेऊन परलोकीच्या प्रवासाला जीव निघाला की तो प्रवास आनंदाचा होतो. ‘तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप.’ नामशिदोरीची चव चाखण्यासाठी जिभेला नामाचे वळण लावणे हा एकमेव पर्याय आहे.
-स्नेहा शिनखेडे