उमेदवार जगदीश शेट्टर यांची भाजी व्यापाऱ्यांशी चाय पे चर्चा
जय किसान भाजी मार्केट परिसरात प्रचार
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले असताना भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शनिवारी सकाळी गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केटला भेट देऊन येथील व्यापारी तसेच कामगारांसोबत चाय पे चर्चा केली. व्यापारी, शेतकरी, विक्रेते यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून किसान सन्मान निधी देशातील शेतकऱ्यांना दिला जात आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक मदत होताना दिसत आहे. याबरोबरच नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लागू केल्या असून त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी कृषीमालावर प्रक्रिया करण्याचे व्यवसाय सुरू केले आहेत. यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले, भाजपने यावेळी एक जुना जाणता नेता बेळगावमधून उमेदवार म्हणून दिला आहे. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्रिपदांवर तसेच मुख्यमंत्रिपदावर काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा बेळगावला नक्कीच फायदा होईल. तसेच मोदींच्या 400 पारमध्ये जगदीश शेट्टर हे नक्कीच असतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जय किसान भाजी मार्केटचे अध्यक्ष दिवाकर पाटील, उपाध्यक्ष मोहन मन्नोळकर, सचिव ए. के. भगवान, डॉ. रवी पाटील, विश्वनाथ पाटील यासह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.
एलआयसी सल्लागारांसोबत चर्चा
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी सायंकाळी बेळगावमधील एलआयसी सल्लागारांसोबत चर्चा केली. देशात चांगले सरकार येण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यसभा माजी सदस्य प्रभाकर कोरे, विक्रम लेंगडे, राजू पाटील यांच्यासह शहरातील विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.