मुंबईचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर : अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादवही खेळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी मुंबईने संघ जाहीर केला आहे. शार्दूल ठाकूरकडे मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि सरफराज खान यांसारखे स्टार खेळाडूही संघात आहेत. मागील वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने हा किताब जिंकला होता, पण यंदा अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे.
वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि तनुश कोटियन यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. यंदाच्या रणजी हंगामात फक्त पाच सामन्यांत तीन शतकं आणि एक अर्धशतक झळकवत तब्बल 530 धावा करणाऱ्या सिद्धेश लाडलाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, टीम इंडियाचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवही या स्पर्धेत खेळणार आहे. मागील काही काळापासून सूर्याची बॅट तळपलेली नाही, यामुळे या स्पर्धेत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल.
बुधवारपासून स्पर्धेला सुरुवात
सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचा एलीट गट 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. पहिला टप्पा लखनौ, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता येथे होईल, तर नॉकआउट सामने इंदूरमध्ये खेळले जातील. मुंबईचा पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी रेल्वेविरुद्ध होणार आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबई संघ : शार्दुल ठाकूर (कर्णधार), हार्दिक तोमोर (यष्टीरक्षक), अंगकृष्ण रघुवंशी (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, साईराज पाटील, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शम्स मुलाणी, तुषार देशपांडे.