For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत Sharad Pawar नेमकं काय म्हणाले?

04:00 PM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत sharad pawar नेमकं काय म्हणाले
Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच एकत्र येणे अशक्य

Advertisement

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक संदर्भ असतात. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाची बलस्थाने पाहून निर्णय घ्यावे लागतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मांडली.

पवार म्हणाले, सर्वच पक्षांची विविध ठिकाणी बलस्थाने आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच एकत्र येणे अशक्य आहे. याचे निर्णय ज्या त्या वेळी घेतले जातील. राज्यात जातीय तेढ वाढल्याची खंत व्यक्त करत ते म्हणाले, राज्य सरकारने राज्यात सामाजिक ऐक्य प्रस्तापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

Advertisement

अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. सरकारने सर्वांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण दुर्दैवाने तसे होत नाही. मराठा समाजाचा ओबीसींच्या यादीत आपण समावेश केला नसल्याची टीका होते या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, 1994 मध्ये मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा हा प्रश्न त्याकाळी उपस्थितच झाला नाही.

त्यावेळी छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बसून निर्णय घेतले. मात्र, आता असे एकत्रित बसून निर्णय होत नसल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. जाहिरातीतील देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा संदर्भ देत पवार म्हणाले, शिवाजी महाराजांनी दुष्काळात सोन्याचा फाळ तयार करुन शेतकऱ्यांची जमीन नांगरली होती.

आता अतिवृष्टीमुळे राज्यात शेत, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिके बाहून गेली आहेत. त्यामुळे शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागणाऱ्या देवाभाऊंनी छत्रपतींच्या कार्याचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी.

उद्धव, राज ठाकरे एकत्र आल्यास चांगलेच

मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर ते चांगलेच आहे. मुंबई, ठाणे येथे शिवसेना शक्तीशाली आहे. त्यामुळे याचा फायदा त्या दोघांनाही अन महाविकास आघाडी म्हणून आम्हालाही होईल.

वाढदिवसासारख्या कार्यक्रमात कोणतेही राजकारण नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचा असतो. पंतप्रधान मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मी देखील त्यांना पत्र लिहून अभिनंदन केले. आम्ही सगळेजण यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणत नाही. माझा ७५ वा वाढदिवस होता त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणले नाही, आम्हीही आणू इच्छित नाही, असे शरद पवार म्हणाले.

विश्वासार्हता जपण्याचे काम निवडणूक आयोगाने करावे

निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. एकाचवेळी संसद सोडून ३०० खासदार निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आयोगाने विश्वासार्हता जपावी, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

Advertisement
Tags :

.