विरोधाला न जुमानता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण केला जाईल : संजू परब
शक्तिपीठला विरोध करणाऱ्यांचे आयुष्य जंगल तोडण्यात गेले ; विरोधकांना टोला
सावंतवाडी । प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. हा महामार्ग झालाच पाहिजे. हा महामार्ग झाल्याने इथल्या उद्योजकांना , तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इथली फळे नागपूरला 10 तासात पोहोचल्याने रोजगार निर्माण होईल. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. काही ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. बांदा ग्रामसभेत देखील शक्तीपीठला विरोध झाला. मात्र विरोधाला न जुमानता हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण केला जाईल असे स्पष्ट मत शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे , गुरु सावंत , पप्पू सावंत , आदी उपस्थित होते . परब पुढे म्हणाले, ज्या शेतकरी,जमीनधारकांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्यांच्या मागण्या देखील समजून घेऊन सोडवल्या जातील. या महामार्गात जमिनी जाणाऱ्यांना मोबदला देखील मिळवून दिला जाईल. शक्तीपीठ महामार्गाला जे विरोध करत आहेत.त्यांचा धंदा लाकूडतोडीचा. असे लोक आता पर्यावरण वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. ज्यांचे आयुष्य वर्षानुवर्षे जंगले तोडण्यात गेली आणि ज्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला असेच लोक आता शक्तीपीठला विरोध करीत आहेत. असा टोला देखील संजू परब यांनी विरोधकांना लगावला.