पिरनवाडी येथे गटारीचे सांडपाणी थेट विहिरीत
पाटील गल्लीतील प्रकार : नगरपंचायतीचे दुर्लक्ष
वार्ताहर/किणये
गावात, गल्लीत एखादी नागरी समस्या निर्माण झाली असेल तर सहाजिकच नागरिक ग्रामपंचायत अथवा नगरपंचायतीकडे धावतात. मात्र या सरकारी कार्यालयात जाऊनही नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न पिरनवाडी पाटील गल्ली येथील गटारीच्या समस्येवरून निर्माण झालेला आहे. पाटील गल्ली, पिरनवाडी येथील बिरदेव मंदिराच्या बाजूला एक गटार आहे. सदर गटार काही ठिकाणी बुजलेली आहे. त्यामुळे गटारीतून येणारे सांडपाणी गंगाराम मल्लाप्पा कदम यांच्या विहिरीत जात आहे. त्यामुळे सदर विहिरीतील पाणी दूषित होत आहे.
नगरपंचायतीला वारंवार कळवूनही या समस्येकडे नगरपंचायतीच्या नोडल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची तक्रार गंगाराम कदम व गल्लीतील नागरिकांनी केली आहे. यापूर्वी पिरनवाडी ही ग्रामपंचायत होती. 2021 साली ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली. वास्तविक नगरपंचायत झाल्यानंतर गावचा विकास होणे गरजेचे आहे. मात्र नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून गावातील नागरी समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. पाटील गल्लीतील या गटारीची नोडल अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.