खादरवाडीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
योग्य नियोजनाअभावी धरणानेही तळ गाठला : बक्कापा झऱ्याचे पाणीही अल्पप्रमाणात
वार्ताहर /मजगाव
पिरनवाडी पट्टण पंचायतीच्या हद्दीतील खादरवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. प्रत्येक सार्वजनिक नळाशेजरी रांग लावून पाण्याच्या प्रतीक्षेत महिला व्याकूळतेने पाण्याची वाट पहात आहेत. सुमारे पाच हजार लोकवस्तीचे गाव. परंतु सुविधांपासून वंचित आहे. गावच्या दक्षिणेला मोठे धरण आहे. परंतु त्याचा उपयोग फक्त जनावरांना होत आहे. सदर धरणानेही तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. योग्य नियोजन केल्यास खादरवाडी, पिरनवाडी व इतर परिसरातील नागरिकांना त्या धरणाचा लाभ होईल, असे जाणकर नागरिकांचे मत आहे. सध्या खादरवाडी गावाला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खादरवाडी गावच्या उत्तरेकडील एक बोअरवेलला पाणी आहे. परंतु त्याचा सलग उपशाने काही घागरीच पाणी मिळत असते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील पाण्याच्या टाकीसमोर कळशा ठेवून महिला उन्हा-तान्हात पाण्याच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे. सध्या खादरवाडी गावात पाच सार्वजनिक विहिरी आहेत. पण त्या निकामी आहेत. गावच्या पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी सुमारे दोन किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र बक्काप्पा देवस्थान आहे. त्या ठिकाणी बारमाही जिवंत पाण्याचा झरा आहे. कृपा त्या बक्काप्पाची, त्या झऱ्याचेच पाणी काही प्रमाणात उपलब्ध आहे. परंतू सर्वांना ते पुरत नाही. त्यामुळे सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की, काखेत कळसा आणि गावाला वळसा. संबंधीत अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित पाण्याची सोय करावी. अन्यथा पट्टण पंचायतीवर घागर मोर्चा काढू, असा इशारा महिलांनी दिला आहे.