सातबारा उताऱ्यातील खातेबदलासाठी सात-आठ महिन्यांची प्रतीक्षा
शिरस्तेदार-तलाठ्यांमध्ये समन्वयाचा अभाव : तांत्रिक दोषामुळे विलंब होत असल्याचे उत्तर
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
सातबारा उताऱ्यातील खातेबदल यंत्रणा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही तांत्रिक कारणाने तहसीलदार कार्यालयांतर्गत येणाऱ्या भूमी विभागात तर तलाठ्यांकडेही अर्ज दाखल होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे मृत व्यक्तीचा वारसा करून नवीन नावे चढविण्याची प्रक्रिया रखडली जात असल्याने नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
खातेबदलाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य सरकारने यामध्ये अनेक बदल केले. पूर्वी केवळ बेळगाव तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागाकडे अर्ज दाखल करावे लागत होते. त्यानंतर मात्र यामध्ये बदल करत प्रत्येक विभागातील तलाठी अधिकाऱ्यांना हे काम सोपविण्यात आले. मृत व्यक्तीची नावे कमी करून त्यांच्या वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर चढविण्याचे कामे तलाठ्यांना देण्यात आले होते.
मागील काही महिन्यांपासून या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत. खातेबदलासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना सात ते आठ महिने वाट पहावी लागत आहे. तलाठी अधिकाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून भूमी विभागातील शिरस्तेदारांकडे जाण्याची सूचना केली जात आहे. तर भूमी विभागातील अधिकारी तलाठ्यांकडे नागरिकांना पाठवत आहेत.
तहसीलदारांनी लक्ष देण्याची गरज
काही वेळा सर्व्हर नसल्याचे उत्तर देण्यात येते. परंतु ही खातेबदलाच्ााr नेमकी प्रक्रिया का रखडली जात आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने सातबारा उताऱ्यांवर खातेबदलासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. परंतु प्रशासकीय पातळीवर योग्य यंत्रणा कार्यरत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तहसीलदार अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी केली जात आहे.