अमलीपदार्थ प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
वर्षभरात 204 किलो अमलीपदार्थ जप्त : वर्षभरात 197 जणांना अटक
पणजी : राज्यात अमलीपदार्थ मोठ्या प्रमाणात सापडत असले तरी अशा प्रकरणांना मुळासकट उपटून काढण्यासाठी सरकारने अमलीपदार्थ विरोधी विभाग व गोवा पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे 204 किलो अमलीपदार्थ सापडले असून, यामध्ये गुंतलेल्या 197 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अमलीपदार्थ आढळताना याला काही युवक बळी पडल्याचेही निदर्शनास येत आहे. अमलीपदार्थासारख्या प्रकरणांना आळा बसण्यासाठी सजग जनतेने पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. वर्षभरात 204 किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत 8.38 कोटी ऊपये आहे. पोलिसांनी जप्त केलेला अमलीपदार्थ कुंडई येथील बायोमेडिकल वेस्ट फॅक्टरीत वेळोवेळी जाळून नष्ट केला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘सनबर्न’रात्री 10 वाजेपर्यंतच
वागातोर येथील सनबर्न महोत्सवाला संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे. रात्री दहानंतर हा महोत्सव सुरू राहिल्यास न्यायालयाच्या निर्देशनानुसार कारवाई केली जाणार आहे.