फुटिरवादी आसियाची न्यायालयात धाव
एनआयएला नोटीस : जन्मठेपेच्या विरोधात याचिका
वृत्तसंस्था
श्रीनगर
काश्मिरी फुटिरवादी नेत्या अन् प्रतिबंधित संघटना दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबीने जन्मठेपेच्या शिक्षेच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करत एनआयएला नोटीस जारी करत उत्तर मागविले आहे. उच्च न्यायालयाने अंद्राबीसोबत याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या तिच्या दोन सहकारी सोफी फहमीदा अन् नाहिदा नसरीनच्या याचिकांवरही एनआयएला भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
तसेच सत्र न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेला सुनावणी प्रलंबित राहण्यापर्यंत स्थगिती देण्याच्या मागणीवरही एनआयएला भूमिका मांडण्याचा निर्देश देण्यात आला आहे. हे प्रकरण 2018 मध्ये एनआयएकडून नोंद एफआयआरशी निगडित आहे. अंद्राबी तिच्या सहकारी दुख्तरान-ए-मिल्लतच्या बॅनर अंतर्गत जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळा करण्याचा कट रचत होत्या असा आरोप एनआयएने केला होता.
एनआयएने सुनावणीदरम्यान पुराव्यांदाखल अनेक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट सादर केले होते, ज्यात कथित स्वरुपात दहशतवादी बुरहान वाणीची प्रशंसा, दगडफेकीला बळ देणे आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ वक्तव्यं सामील होती. ही संघटना ट्विटर, फेसबुक, युट्यूब आणि पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांद्वारे ‘भारतविरोधी बंड अन् द्वेषपूर्ण संदेश’ फैलावत होती असा एनआयएचा आरोप आहे.
कडकडडूमा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी 14 जानेवारी 2026 रोजी तिन्ही फुटिरवादी महिलांना दोषी ठरविले होते. त्यांना युएपीएचे कलम 20, 38, 39 आणि भादंविचे कलम 153ए, 153बी, 120बी, 505 आणि 121ए अंतर्गत दोषी ठरविण्यात आले होते. 24 मार्च 2026 रोजी शिक्षा सुनावत न्यायालयाने अंद्राबीला जन्मठेप, सोफी फहमीदा अन् नाहिदा नसरीनला प्रत्येकी 30 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
कोण आहे आसिया अंद्राबी
64 वर्षीय आसिया ही मूळची श्रीनगरची रहिवासी आहे. पदवीधर असलेल्या आसियाने 1987 साली दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनेची स्थापना केली होती. प्रारंभी याला एक सामाजिक-धार्मिक सुधार आंदोलन ठरविण्यात आले, प4रंतु नंतर ही कट्टरवादी फुटिरवादी महिला संघटना ठरली होती. केंद्र सरकारने 2018 साली युएपीए अंतर्गत या संघटनेला दहशतवादी घोषित करत बंदी घातली होती. पाकिस्तान समर्थनप्राप्त फुटिरवाद, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांसाठी फंडिंग, युवांना भडकविणे, भारतविरोधात युद्ध पुकारण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप अंद्राबीवर आहे.