पर्यावरणाचा आवाज हरपला ; ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन
वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सावंतवाडी -
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ , पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. . वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ
डॉ. माधव गाडगीळ हे भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत मान्यवर नाव होते. पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती.सिंधुदुर्ग जिल्हयात सावंतवाडी , दोडामार्ग परिसरात ४० मायनिंग प्रकल्प प्रस्तावित होते . गाडगीळ यांच्या अहवालामुळे या प्रकल्पांना ब्रेक बसला होता .त्यापैकी काही प्रकल्पांची सुनावणी झाली होती . गाडगीळ यांनी केंद्राला पश्चिम घाट संवर्धनासंदर्भात सादर केलेल्या अहवालापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी पाहणीही केली होती .येथील स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांनी अहवाल सादर केला होता . लोकांच्या कलाने विकास ही त्यांची संकल्पना होती . अहवाल विकासाला बाधक ठरणार असल्याचा कावा राज्यकर्ते करीत होते . परंतु, गाडगीळ यांनी निसर्ग राखूनच विकास करण्यासाठी सुचविले होते . दैनिक तरुण भारत संवादमध्ये त्यांनी पर्यावरणविषयक अनेक लेख लिहले होते .