For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणीपट्टी दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार : राजू शेट्टी यांचा इशारा

01:21 PM Jan 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
पाणीपट्टी दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार   राजू शेट्टी यांचा इशारा
Advertisement

सरुड : वार्ताहर
शासनाच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणीपट्टी दरात तब्बल दहापट दरवाढ करण्याचा व कृषि पंपाना पाणीमीटर बसविण्याचा काढलेल्या तघुलकी आदेशाने अगोदरच अडचणीत असणारा शेतकरी हा पुर्णपणे उध्वस्त होणार असल्याने ही पाणीपट्टी दरवाढ रद्द न केल्यास या दरवाढीच्या आदेशाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जलसंपदा विभागाच्या पुणे येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढुन तीव्र आदोलंन छेडणार असल्याचा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी 'तरुण भारत'शी बोलताना दिला .
राजू शेट्टी हे कार्यक्रमानिमत्त सरुड येथे आले असता शेतीसाठीच्या पाणीपट्टी दरात जलसंपदा विभागाने केलेल्या दरवाढी प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते .

Advertisement

राजू शेट्टी पुढे म्हणाले , शेतीमध्ये वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे उत्पन्न आणी उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसत नाही . लहरी हवामानामुळे शेतीवर येणारी नैसर्गिक संकटे, शेती क्षेत्राविषयी शासनाकडुन राबविण्यात येणारी चुकीची धोरणे ,रासायनिक खतांची सातत्याने सुरु असलेली दरवाढ , महागाईमुळे शेती मशागतीचा तसेच शेती औषधांचा वाढलेला खर्च यामुळे शेती क्षेत्रासह शेतकरी वर्ग चोहोबाजूंनी संकटात सापडला असताना या भर म्हणून जलसंपदा विभागाने शेतीसाठीच्या पाणीपट्टी दरामध्ये दहा पट वाढ करण्याचा तसेच कृषिपंपाना पाणी मीटर बसविण्याचा काढलेला आदेश म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे . प्रतिहेक्टरी १३० रु . असणाऱ्या पाणी पट्टी करात दहापट वाढ करून ही करवाढ प्रतिहेक्टरी १३६०८ रु एवढी केली आहे . ही करवाढ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे .

एकीकडे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसताना दुसरीकडे जलसंपदा विभागाने पाणीपट्टीत केलेल्या या अन्यायी दरवाढीमुळे उत्पादन खर्चात आणखीन वाढ होणार असुन चोहोबाजूंनी अडचणीत असलेला शेतकरी व शेतीक्षेत्र पुर्णपणे उध्वस्त होणार आहे . त्यामुळे शेतकरी हितासाठी जलसंपदा विभागाने या अन्यायी पाणीपट्टी दरवाढीचा आदेश रद्द करणे गरजेचे आहे . जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर योग्यभाव मिळत नाही तोपर्यंत पाणीपट्टी मध्ये कोणतीही दरवाढ न करता या पाणीपट्टी कराचा दर हा पुर्वीप्रमाणेच म्हणजेच हेक्टरी १३० रु . असा स्थिर ठेवावा . यातुनही जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांकडुन वाढीव दराने पाणीपट्टी वसुल करण्याचा घाट घातल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जलसंपदा विभागाच्या पुणे येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढुन वाढीव दराने शेतकऱ्यांकडुन पाणीपट्टी वसुली करण्याचा डाव हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही माजी खा . राजू शेट्टी यांनी यावेळी दिला .

Advertisement

यावेळी शे. का. पक्षाचे भाई भारत पाटील, सागर संभूशेटे राजाराम मगदूम , संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, रायासिंग पाटील , जयसिंग पाटील - चरणकर , अजित सांळूखे , गुरुनाथ शिंदे , अवधुत जानकर , पद्मसिंह पाटील ( साळशी ) मनिष तडवळेकर , आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Advertisement
Tags :

.