भूजल पातळी वाढविण्यासाठी रामदुर्गमधील 26 ग्रा.पं.ची निवड
अटल भूजल योजनेंतर्गत उपक्रम : खासदार इरण्णा कडाडी यांची माहिती
बेळगाव : अंतर्जल पातळी सुधारण्याबरोबरच पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत भूजल वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील रामदुर्ग तालुक्यातील 26 ग्राम पंचायतींमधील 3806 हेक्टर क्षेत्र सुक्ष्म पाणीपुरवठा व्याप्तीमध्ये आणण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी राज्यसभेमध्ये दिली. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी ही माहिती दिली. राज्यसभेमध्ये अर्थसंकल्प अधिवेशनात बेळगाव लोकसभा मतदारसंघातील कृषी क्षेत्रामध्ये अंतर्जल वापराच्या सुरक्षिततेसाठी अटल भूजल योजनेंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बिश्वेश्वर यांनी उपरोक्त माहिती दिली. केंद्रीय भूजल बोर्डाकडून देशातील अनेक भागातील भूजल पातळीचे नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव विभागाचाही समावेश आहे. भूजल गुणवत्ता परीक्षण कार्यक्रम आणि वैज्ञानिक अभ्यासाद्वारे अनेक अंश संग्रहित करण्यात आले आहेत. केंद्रीय भूजल बोर्डाकडून याचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात आला आहे.
याअंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे संयुक्त योजना राबविल्या जाणार आहेत. भूजल गुणवत्ता विभागाकडून संग्रहित करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार पाण्यामध्ये लोह, क्लोराईड, नायट्रेट, युरेनियम आदी अंश आढळून आले आहेत. भूजल पातळी वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात असून अंतर्जल पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये अंतर्जल पुनरुज्जीवन योजना राबविली जात आहे. यासाठी बेळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानुसार 741 टँक, 3700 चेक डॅम उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये पाण्याची अंतर्जल पातळी वाढविण्यासाठी व समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जागृती सभा, रॅली, जाहीर प्रकटन, चित्रकला, निबंध आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करून जागृती केली आहे. अटल भूजल योजनेंतर्गत राज्य सरकारकडून 13.77 कोटी अनुदान दिले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली असल्याचे खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले.