बीडप्रकरणी उच्चपदस्थांचे राजीनामे घ्या
पुणे :
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलताना केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बीडमधील घटना अत्यंत निंदनीय तसेच गंभीर असून याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. सरकारने या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत. कोणीही उच्च पदस्थ यामध्ये असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करणे सरकारचे कर्तव्य आहे. अशा घटनांमुळे राज्यामध्ये गुंतवणूकदार येण्याचे प्रमाण थांबेल. उद्योगासाठी पोषक वातावरण राज्यात असणे आवश्यक असते, नाहीतर महाराष्ट्र कधी मागे पडेल हे कळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनांबाबत तातडीने पावले उचलली पाहिजेत, याकडे लक्ष द्यावे. त्यांचे हे अपयश आहे.
सध्या परळीमध्ये नेमकं काय चालतं? ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच तेथील लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. दमानिया यांनी महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहार समोर आणले आहेत. त्यांना धमक्या येत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी जर अन्यायाला वाचा फोडत असतील तर सरकारने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काळजी घेतली पाहिजे. एखाद्याची निर्घृण हत्या करणे हा मानवतेचा मुद्दा आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घडलेल्या घटनांचे गांभीर्य बाळगून जबाबदारी स्वीकारत कडक कारवाई केली पाहिजे. घडलेली घटना कोणाच्या आदेशाने किंवा राजाश्रयाने झाली हे महाराष्ट्रातील जनतेला समजले असून याबाबत तथ्यता सरकारने समोर आणून देशमुख कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे.
राज्यातील अशा घटनांमुळे जर गुंतवणूकदार आले नाहीत तर रोजगार निर्माण होणार नाहीत. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उत्पन्न घटत चालले आहे. देशात महाराष्ट्र अकराव्या स्थानावर आला आहे. हे सर्व भाजपचे अपयश आहे. परळी पॅटर्न जगजाहीर आहे. राजकीय हेतूसाठी संबंधितांना वाचवले गेले तर जनता शांत बसणार नाही, असे चव्हाण म्हणाले.