सुरक्षेत कपात; शिंदेंच्या मंत्री, आमदारांची नाराजी
एकनाथ शिंदे फडणवीसांसोबत चर्चा करणार : 17 फेब्रुवारीपासून निर्णय लागू
मुंबई , प्रतिनिधी
महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अजून मिटलेला नाही. दोन जिह्यांचे पालकमंत्री पद स्थगित करण्यात आले आहे. त्यातच शिंदेंच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता त्यात कपात करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु आता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुरक्षा कमी करण्याचा निर्णय 17 फेब्रुवारी लागू करण्यात आला आहे. मंत्र्यांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यामुळे मंत्री आणि आमदार नाराज आहेत. याबद्दलची नाराजी संबंधीतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी मंत्री आणि आमदारांना दिले आहे.
व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात होणार आहे.
शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी
या सुरक्षा कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना. या आधी शिंदेंच्या आमदारंना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. त्यामध्ये या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस सुरक्षा तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे.
आता आमदारांसोबत एकच सुरक्षा रक्षक
नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या आधी सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एका रक्षकाची सुरक्षा मिळणार आहे.