‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राज्यात सुरक्षा व्यवस्थेत वाढ
पोलिस महासंचालक अलोक कुमार यांची माहिती
पणजी : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गोवा हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून, राज्यात सुरक्षिततेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी तसेच किनारपट्टी आणि पर्यटनदृष्ट्या संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली. हा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार घेतल्याचे महासंचालक अलोक कुमार यांनी स्पष्ट केले असून राज्यभरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र व सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वयाने बैठका सुरू आहेत. बुधवारी राज्यात मॉकड्रिलही पार पडले असून आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी तपासण्यात आली. बैठकीतील काही निर्णय गोपनीय असल्याचे पर्वरी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर बोलताना पोलिस महासंचालक अलोक कुमार म्हणाले.
दिवसा आणि रात्रीच्यावेळी पोलिस गस्त वाढवण्यात येणार असून, विशेषकरून बागा, कळंगुट, मिरामार, पणजी, वास्को, मडगाव, हणजूण, पाळोळे या परिसरांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गोव्यातील सुरक्षितता अधिक भक्कम करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिस दल सातत्याने कार्यरत आहे. याशिवाय, काही ठिकाणी सुरक्षा कॅमेरे, गस्त पथक, तसेच विशेष पोलिस पथक कार्यरत राहणार आहेत. गर्दीच्या काळात ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करून नजरेखाली परिसर ठेवला जाणार आहे, असेही पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, आगामी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे धोरण राबविण्यात येत आहे.
दाबोळी विमानतळावर अलर्ट जारी
भारत व पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दाबोळी विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विमानतळावरची सुरक्षा अत्यंत कडक करण्यात आली आहे.