समुद्री खाद्यान्नाची निर्यात सर्वकालीक उच्चांकावर
2025-26 वर्षात अंदाजे 20 लाख टन निर्यात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जागतिक बाजारात अस्थिरतेचे ढग असतानाही भारताने आपल्या समुद्री खाद्यान्नाची निर्यात ही सर्वकालीक उच्चांकावर राहिली होती. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जवळपास 20 लाख टन इतक्या समुद्री खाद्यान्नाची निर्यात भारताने केली असल्याची माहिती आहे. समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीइडीए) यांनी यासंबंधी माहिती देताना, सदरच्या आर्थिक वर्षात 19.72 लाख टन इतक्या समुद्री खाद्यान्नाची निर्यात करण्यात आली असून त्याचे मूल्य 73,890 कोटी रुपये इतके होते. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत खाद्यान्न निर्यात 16 टक्के तर मूल्य 18 टक्के इतके वाढीव दिसून आले.
अमेरिका आणि चीन या दोन देशांनी खाद्यान्नाची आयात भारतातून सर्वाधिक केलेली आहे. 7 लाख 92 हजार 647 इतक्या कोळंबी निर्यात केल्या असून त्यांचे मूल्य जवळपास 49,037 कोटी इतके होते. संख्येच्या तुलनेत वाढ 6.89 टक्के तर मूल्याच्या तुलनेत 13 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. सध्याला महागाईचा दबाव, पुरवठा साखळी विस्कळीत होणे यासारख्या आव्हानांना निर्यातदारांना तोंड द्यावे लागते आहे. मागणीत अस्थिरता असल्याने निर्यातदारांची चिंता वाढली आहे. पश्चिम आशिया संकटात निर्यातीवर काहीसा परिणाम जाणवत आहे.