Sea Moss Farming: कोकणातील समुद्री शेवाळ शेतकरी, महिलांना कसं स्वावलंबी बनवतंय?
या उपक्रमाद्वारे ‘कॅपाफायकस’ प्रजातीचे समुद्री शेवाळ शेतकरी आणि महिलांसाठी दिले जाते
By : विजय पाडावे
रत्नागिरी: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अल्पभूधारक शेतकरी व मत्स्य व्यवसायिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कार्यरत जलजीविका संस्थेने ‘समुद्री शेवाळ’ शेतीच्या माध्यमातून एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे उत्पन्नवाढीचा नवा मार्ग समोर आला आहे. दोन्ही जिह्यांमध्ये एकूण 64 बांबू तराफे यशस्वीरित्या उभारण्यात आले आहेत. रत्नागिरी जिह्यातील नांदिवडे, अंबुवाडी येथे 22 तराफ्यांची ‘सीड बँक‘ तयार करण्यात आली आहे.
जलजीविका या अशासकीय संस्थेने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील विविध गावांमध्ये समुद्री शेवाळ शेतीविषयी प्रशिक्षण देऊन महिलांना तसेच शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य हाती घेतले आहे. जलजीविका संस्थेचा हा उपक्रम दोन्ही जिह्यांमध्ये यशस्वीदेखील झाला आहे. या उपक्रमाद्वारे ‘कॅपाफायकस’ प्रजातीचे समुद्री शेवाळ शेतकरी आणि महिलांसाठी दिले जाते. रत्नागिरीचे सागरी वातावरण या प्रजातीच्या वाढीसाठी पोषक आहे. शेवाळच्या या प्रजातीची वाढ 45 दिवसांतच होत असल्याने शेतीकरिता या प्रजातीची निवड करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
कॅपाफायकसच्या लागवड पद्धतीत प्रामुख्याने बांबू तराफा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी व मत्स्य व्यवसायिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कार्यरत जलजीविका ही नोंदणीकृत अशासकीय संस्था समुद्री शेवाळ शेतीच्या माध्यमातून एक नवा उपक्रम करत आहे. संस्थेने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील विविध गावांमध्ये समुद्री शेवाळ शेतीविषयी प्रशिक्षण देऊन महिलांना आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
समुद्री शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती असून ती उथळ समुद्रकिनाऱ्याच्या पाण्यात तसेच खाडी भागात आढळते. तपकिरी व लाल रंगातील शेवाळाचे उत्पादन व विक्री शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरते. जलजीविका संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकांत मिश्रा, मुख्य कार्यक्रम अधिकारी सुबोध कुमार, प्रकल्प व्यवस्थापक चिन्मय दामले, सृष्टी सुर्वे, राज पवार, प्रकल्प समन्वयक समृद्धी सनगरे यांच्या सहाय्याने समुद्री शेवाळ शेतीबाबत उत्तम मार्गदर्शन लाभत आहे. हा प्रकल्प ‘हर्बललाईफ’ या उद्योग समूहाच्या सहाय्याने राबवण्यात येत आहे.
कॅपाफायकस शेवाळाचे फायदे
भविष्यात यामधून अल्पभूधारक शेतकरी आणि महिलांना कायमस्वरुपी रोजगार मिळू शकतो.समुद्री शेवाळ हे ‘मॅक्रोलग्गे‘ या गटात मोडते. ‘समुद्री शेवाळ‘ ही नवनिर्माण करण्यायोग्य सेंद्रिय सामग्री आहे. याचा वापर जैव इंधन, बायोप्लॅस्टिक, सौंदर्य प्रसाधने, मानवी अन्न, खतनिर्मिती आणि औषध निर्मितीत होतो. येथील या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या ‘कॅपाफायकस अल्वारेझी‘ या समुद्री शेवाळापासून प्रामुख्याने सेंद्रिय खत, औषधनिर्मिती, बायोप्लॅस्टिक तयार केले जाते.
अर्थिक सक्षमतेचा आशादायी किरण
या प्रकल्पासाठी तराफा बांधणी, अँकरींग, रोपे लावणे अशा सर्व टप्प्यांचा समावेश असलेले प्रशिक्षण जलजीविका संस्थेच्या माध्यमातून शेतकरी आणि महिलांना दिले जाते. संस्थेचा हा उपक्रम विशेषत: ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांना शेवाळ शेतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. भविष्यात यामधून महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार असा विश्वास आहे.
- चिन्मय दामले, प्रकल्प व्यवस्थापक-जलजीविका संस्था
समुद्री शेवाळ प्रकल्पाच्या ठळक बाबी
- कॅपाफायकस शेवाळाचा वापर, मार्केटमध्ये चांगली मागणी
- राबवलेल्या प्रकल्पातून आतापर्यंत 650 किलो शेवाळ उत्पादन
- 35 ते 40 दिवसांत शेवाळाची वाढ, वाळवलल्या शेवाळाला किलोमागे 100 ते 110 रुपयांचा मिळतोय दर
- तामिळनाडुमधून मागवण्यात येते शेवाळाचे ‘सीड’
- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांत 64 बांबू तराफ्यांची यशस्वी उभारणी
- रत्नागिरी तालुक्यात नांदिवडे, अंबुवाडी येथे 22 तराफ्यांची ‘सीड बँक‘
- केळये-मजगाव येथे 4 तर नांदिवडे येथे 26 मांडव तयार.
- जैतापुरात 100 तराफ्यांची मागणी
- देवगडमध्ये लाभार्थ्यांना 10 तराफे प्रदान तर 28 मांडवांची निर्मिती
- देवगड कावळेवाडी येथे 10 व वायंगणी (वेंगुर्ला) येथे 18 तराफे प्रदान