अमली पदार्थांना नकार; सुरक्षित भविष्याचा करा निर्धार!
न्यायाधीश मंजुनाथ नायक यांचे आवाहन : तरुणांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येण्याची गरज
प्रतिनिधी
बेळगाव
अमली पदार्थांचे वाढते जाळे हे देशाच्या विकासासमोरील गंभीर आव्हान आहे. देशाच्या भावी पिढीला या विळख्यातून वाचविणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. अमली पदार्थांच्या विव्रेत्यांना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबरोबरच समाजात जनजागृती वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मंजुनाथ नायक यांनी व्यक्त केले.
जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित अमली पदार्थांच्या गैरवापर प्रतिबंधावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविणार
नायक म्हणाले, देशाची खरी संपत्ती म्हणजे युवा पिढी. ही पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालये व समाजाने सजग राहिले पाहिजे. अमली पदार्थ नियंत्रण कायद्यात अनेक तांत्रिक तरतुदी असून तपास यंत्रणांनी त्यानुसार काटेकोर कारवाई केली तरच दोषींना शिक्षा होऊ शकते. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या काळात शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अमली पदार्थांचे व्यसन समाजासाठी धोकादायक
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, अमली पदार्थांचे व्यसन समाजासाठी धोकादायक आहे. तरुण पिढीने मेहनत, शिक्षण व करिअरकडे लक्ष द्यावे. अमली पदार्थांचे पुरवठादार विविध आमिषे दाखवून तऊणांना जाळ्यात ओढत असतात. यापासून सावध राहण्याची गरज असून राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नको भाऊ’ (‘बेडा ब्रो’) मोहिमेंतर्गत अमली पदार्थांना नकार देण्याबरोबरच पुरवठादारांची माहिती धैर्याने पोलिसांना देण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात 17 लाख लोक अमली पदार्थांच्या विळख्यात
पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, 2018 च्या सर्वेक्षणानुसार देशात सुमारे 8 कोटी तर राज्यात 17 लाख लोक अमली पदार्थांच्या व्यसनाधीन आहेत. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या संकटावर नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. विविध मार्गांनी देशात अमली पदार्थांची तस्करी होत असून त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस व इतर यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयीन तऊणांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन अधिक
जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाईचा आढावा देताना बोरसे म्हणाले, 2024 मध्ये 2 लाख, 2025 मध्ये 35 लाख तर यावषीच्या 6 महिन्यात 6 लाख ऊपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन तऊणांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले असून ही बाब चिंताजनक आहे. शाळा व महाविद्यालय परिसरातील संशयास्पद ठिकाणांवर व बिडी-सिगारेट विक्रीच्या दुकानांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अमली पदार्थांचा पैसा अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांना बळ देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, जिल्हा आरोग्याधिकारी आय. पी. गडाद, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त आर. एस. स्वप्ना, बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एन. शिवकुमार, कायदा साहाय्य संरक्षण समितीचे सदस्य लक्केश हेग्गनवर, निवृत्त डीएसपी जी. जी. मरिबशेट्टी, मानसोपचारतज्ञ डॉ. सरस्वती, मानसिक आरोग्याधिकारी उत्तम शेलार, कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, विशाल पवार, जिल्हा सर्वेक्षक डॉ. अरविंद अंटीन, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राममूर्ती के. व्ही. यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.