CM फडणवीसांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुध्दी दे, पाटील-शेट्टींचे विठ्ठलाचरणी साकडे
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्व शेतकरी एकत्रित आले
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी. राज्यातील जनतेसाठी आणि मुख्यत: शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुध्दी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठलचरणी साकडे घातले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी या मागणीसाठी पंढरपुरात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्व शेतकरी एकत्रित आले. यावेळी विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकड घालण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , सम्राट मोरे, महेश खराडे, अनिल पवार , पोपट मोरे, धनाजी पाटील, विठ्ठल मोरे, शशिकांत खोत, सचिन शिंदे, तानाजी बागल, धनंजय महामुलकर, विजय रणदिवे, राजाराम देसाई उपस्थित होते.