Satej Patil On Almatti Dam: ...तर थेट अलमट्टीवर धडकणार, सतेज पाटलांचा इशारा
अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी
Satej Patil On Almatti Dam : अलमट्टी धरण उंचीविरोधात आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अंकली येथे चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील बडे नेते या आंदोलनात सहभागी झाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभावी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, आता या आंदोलनात उपस्थित असणाऱ्या कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य शासनाने फक्त घोषणा न करता निर्णायक भूमिका घ्यावी. शासनाने कणखरपणे केंद्रामध्ये भूमिका मांडावी. जेणेकरून सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यावरील महापुराचा धोका दूर होईल. अशी मागणी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे.
आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनाने 21 तारखेला साडेतीन वाजता बैठक बोलवली आहे. आंदोलन थांबवावे यासाठी लेखी पत्र दिले आहे. पंरतु यावर काहीतरी ठोस उपाय होणे आवश्यक आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय आहे. सरकारमध्ये सत्ताधारी असोत की विरोधक सर्वांच्या भूमिका ठाम आहेत. धरणाची उंची वाढू नये अशी सर्वांची अपेक्षा असून हीच भूमिका असेल अशी खात्री आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
धरणाच्या उंचीबाबत बैठकीत तोडगा निघाला नाही तर कोणती भूमिका घ्याल, यावर आमदार पाटील म्हणाले, या बैठकीय योग्य निर्णय न झाल्यास अलमट्टी धरणावर धडक मारणार असल्याचा इशारा दिला आहे. वडनेरे कमिटीच्या अहवालात जे निकष आले आहेत ते योग्य असतील. परंतु अलमट्टीबाबतीत इतर जिल्ह्यांना पुराचा फटका बसणार नाही, या वाक्याशी सहमत नाही. त्यावर दुमत आहे. त्यामुळे वडनेरे कमिटीचा अहवाल रद्द करण्याची भूमिका शासनाने घ्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले, तेलंगणा सरकार त्यांची भूमिका मांडत आहे. त्यामुळे आमच्या सरकारने आमची भूमिका मांडावी. या बैठकीमध्ये खरं काय आहे ते बाहेर येईल. याबाबत महाराष्ट्राची भूमिका काय आहे? कोर्टात सामील झाले आहे का? महाराष्ट्र तेलंगणा कोर्टात गेल आहे का? या सगळ्याची उत्तरं बैठक झाल्याशिवाय मिळणार नाहीत. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री बोलत आहेत. परंतु जोवर हे कागदावर येत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास नाही, अंसही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
..तर राज्यसरकारने सर्वोच्च न्यायायलाची पायरी चढावी - विश्वजीत कदम
सांगली, कोल्हापूरच्या सर्व पूरग्रस्तांनी आणि लोकप्रतिनीधींनी अंकली पूलावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या विषयावर राज्य सरकारने कर्नाटक सरकारशी चर्चा करावी. अलमट्टीची उंची वाढवण्याबाबतीत सांगली, सातारा कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसान होणार आहे याचा अभ्यास करुन तात्पुरता निर्णय स्थगित करावा.
यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. वेळ पडली तर सांगली, कोल्हापूरकरांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणीही विश्वजीत कदम यांनी केली आहे.