Satara Accident News : घरात लग्नकार्य अन् कुटुंबातील 4 महिलांवर एकाचवेळी काळाचा घाला, नेमकं काय घडलं?
काही कळण्याच्या आतच गाडी बांधाच्या कडेला असलेल्या उतारावरून थेट धरणाकडे गेली
सातारा : उरमोडी धरणा लगत असलेल्या कामथी येथे टेम्पोला अपघात झाला आहे. एका मुलाकडून चुकून हॅन्ड ब्रेक निघाल्याने अनियंत्रित झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचा मृत्यू झाला. या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
लीलाबाई उत्तम अडागळे (वय ५६), मालुबाई सीताराम अडागळे (वय ५०), कल्पना सागर आवळे (वय ३६), गार्गी सागर आवळे (वय 6) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. शिवाय या अपघातात अन्य काही जखमी झाले आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.
घडलेली घटना अशी की, कामथी येथील सीताराम अडागळे यांच्या कुटुंबातील नवीन गावठाणात (पुनर्वसित गावात) निमसोड (खटाव) या ठिकाणी लग्नकार्य चार दिवसांवर आहे. यासाठी येथील घरातील साहित्य गाडीत भरत असताना गाडीचा अपघात झाला. जनावरे आणि इतर सामान हलवण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू होते.
शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कुटुंबातील सहा सदस्य टेम्पोतून जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून हॅन्ड ब्रेक निघाला व काही कळण्याच्या आतच गाडी बांधाच्या कडेला असलेल्या उतारावरून थेट धरणाकडे गेली. गाडी पलटी झाल्याने केबिनमध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही.
यावेळी टेम्पोंतील तीन महिला व एक बालिका जागेवरच ठार झाले आहेत. उर्वरित सदस्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजतात तत्काळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, कासारथळ येथील ग्रामस्थ, युवक यांनी जेसीबीने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.