For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी 575 कोटी ! पालकमंत्र्यांनी विकास आराखडा केला मंजूर

04:35 PM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी 575 कोटी   पालकमंत्र्यांनी विकास आराखडा केला मंजूर
Satara district development plan
Advertisement

लघु पाटबंधारे विभागाच्या घोटाळ्याची चर्चा

सातारा प्रतिनिधी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिह्याच्या विकासासाठी 575 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिह्यातील विविध विकासकामे आगामी कालावधीत मार्गी लागणार आहेत. लघु पाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. 25 लाखांचा बंधारा असताना त्याला 75 लाखांचे इस्टीमेट वाढवून फुगवून करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. गतवेळी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात दोषी आढळून आलेल्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरु आहे, पुन्हा फेरचौकशी करुन जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यावरुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून पाटबंधारे विभागाच्या घोटाळयावरुन सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाची लक्तरे जिल्हा नियोजन सभेत टांगण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिह्याच्या विकासासाठी 575 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यात सर्व विभागाचा समावेश करण्यात आला आहे. केणावरही अन्याय करण्यात आलेला नाही. माझी लाडकी बहिण या योजनेच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला आहे. प्रत्येक लाभार्थी भगिनीला लाभ कसा मिळेल याच्या सूचना दिल्या आहेत. 19 रोजी वाघनख्या येत आहेत. त्याच्या तयारीची बैठक घेतली आहे. नेटके नियोजन करण्यात आले आहे. वाघनखांचे स्वागत हे एक प्रकारे छ. शिवाजी महाराजांना अभिवादन आहे, असे सांगत पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मागच्या सभेत आमदार जयकुमार गोरे यांनी जो मुद्दा मांडला होता. त्याची चौकशी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून करण्यात आली. त्यातच चार बंधाऱ्यापैकी 3 बंधाऱ्यात दोष आढळून आला आहे. त्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य पातळीवरील गुणनियंत्रण समितीच्यावतीने देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

त्यावर आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशीत दोषी आढळून आलेल्यास अधिकाऱ्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. वरपासून खालपर्यंत यंत्रणा यामध्ये सहभागी असू शकते. मोठ्या प्रमाणावर ठेकेदार आणि अधिकारी यामध्ये मिलीभगत असू शकतात. आजपर्यंत क्वालिटी कंट्रोलकडून झालेली तपासणी ही दर्जाहिन काम आहे असा अहवाल आलेला नाही. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पाटबंधारे विभागाचे अभियंता अरुणकुमार दिलपाक हे यामध्ये दोषी आहेतच, त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांचा यामध्ये संबंध आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी केली. त्यावरुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सक्त सूचना दिल्या आहेत.

Advertisement

25 लाखांचा बंधारा इस्टीमेट 75 लाखांचे
आमदार जयकुमार गोरे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लघु पाटबंधारे विभागाकडे कोट्यावधी रुपयांची कामे येतात. ती कामे येत असताना त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी इस्टीमेट वाढवून टेंडर मॅनेज केली आहेत. कामाचा दर्जा पण राहिला नाही. एक बंधारा 25 लाखांचा आहे. त्याचे इस्टीमेट 75 लाखांचे झाले. 80 लाखांचे झाले. एवढे मोठे इस्टीमेट झाल्यानंतर प्रॉपर काम झाले नाही. प्रकरण खूप गंभीर आहे. त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. बिले काढण्यासाठी मोठ्या रकमेची तडजोड झाली आणि कॉन्ट्रक्टर बिले काढण्याची चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. 18 कोटींची कामे होती. कामे मंजूर झाली. कोणाला इकडचे तिकडे करु दिले नाही. टेंडर मॅनेज करुन देण्याचा प्रयत्न झालेला आहे. राज्य शासनाच्या पातळीवर चौकशी सुरु आहे, असे पत्रकारांशी बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.