Satara News : पाण्याच्या वादातून वृद्धाचा कोयत्याने हल्ला; तिघे जखमी
सातारा : शहरातील अदालत वाडा परिसरातील माची पेठ येथे रविवारी रात्री नळाच्या पाण्याच्या वादातून ६५ वर्षीय मद्यपी वृद्धाने कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोन महिला आणि एक युवक जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माची पेठ परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह साफ करण्यासाठी सकाळी येणारे नळाचे पाणी सुरुवातीला तेथे सोडण्यात येते. मात्र संबंधित पाणी स्वच्छतागृहात न सोडता घराकडे वळविण्यात आल्याने परिसरात वाद निर्माण झाला. याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद वाढत जावून आरोपी राजेंद्र मिसाळ (वय ६५) याने हातातील कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप जखमींनी केला आहे.
या हल्ल्यात राकेश सुतार, त्यांची आई तसेच रंजना माने जखमी झाल्या. रंजना माने यांच्या हाताला कोयत्याचा वार झाला. इतर दोघांनाही दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.