सुजल ग्रामविकासासाठी 'सरपंच संवाद' अॅप
रत्नागिरी :
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जलजीवन मिशन यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांना अधिक प्रभावी करण्यासाठी 'सरपंच संवाद' नावाचे एक नवीन मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील सरपंचांना या अॅपचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते २२ एप्रिल २०२५ रोजी या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. 'क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या अॅपचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणणे, संवाद वाढवणे व नवनवीन उपक्रमांची देवाणघेवाण करणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे अॅप तत्काळ डाऊनलोड करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सागर पाटील यांनी केले आहे. यामुळे गावांचा विकास अधिक गतिमान होईल आणि ग्रामीण भाग स्वच्छ, सुजल व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. अॅप डाऊनलोड करण्यासाठीः अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीः https://play.google.com/store/app s/details?id=com.qci.sarpanchsa mvaad&hl=enIN&pli=1, अॅपल वापरकर्त्यांसाठी: https://apps. apple.com/in/app/sarpanch-samvaad/id6452552802 लिंकचा वापरा करावा, असे आवाहन सागर पाटील यांनी केले आहे
- अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये
▶ सरपंच आपल्या गावातील उत्कृष्ट कामे आणि यशोगाथा देशभरातील इतर सरपंचांसोबत शेअर करू शकतात.
▶ विविध विषयांवर प्रशिक्षण, बातम्यांची माहिती मिळवणे आणि ऑनलाईन प्रमाणपत्रे मिळवणे यासारख्या सुविधाही अॅपवर उपलब्ध.
▶ स्वच्छ भारत (ग्रामीण) आणि जलजीवन मिशन या दोन्ही अभियानांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी डिजिटल साधन म्हणून काम करेल