समविचारी संघटनांची संकल्प यात्रा आज बेळगावात
अभिनेते प्रकाश राज यांची उपस्थिती
बेळगाव : राज्यातील विविध समविचारी संघटनांकडून ‘देश वाचवा संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेसाठी राज्यात रथ मिरवणूक काढण्यात येत असून या रथाचे दि. 8 रोजी बेळगावात आगमन होत असून दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून या संकल्प यात्रेला प्रारंभ करून चन्नम्मा चौकमार्गे गांधी भवन येथे जाणार आहे. यानंतर 3 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशामध्ये सनातनच्या नावावर सामाजिक असमानता निर्माण केली जात आहे. जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घातले जात आहे. अशा देशविरोधी शक्तींपासून देशाला वाचविणे गरजेचे आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, दीन-दलितांवर अन्याय, कामगारांची पिळवणूक, शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा अशा प्रकारे देशात पावलो पावली असमानता निर्माण करण्यात येत आहे. भांडवलशाहीला वाव दिला जात आहे. धर्माच्या नावावर देशाचे विभाजन केले जात आहे. या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा शक्ती वाढत आहेत. या माध्यमातून देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकतेवर पकड साधली जात आहे. अशा शक्तींविरोधात हा लढा आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. यासाठी अनेक मान्यवर या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी सिद्धगौडा मोदगी, अॅङ नागेश सातेरी, शिवलिला मिसाळे आदी उपस्थित होते.