Sangli News | समीरचे नाव आले तेव्हा सांगली हादरली!
समीर गायकवाडच्या मृत्यूने पानसरे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत
सांगली ( विनायक जाधव ) : कोल्हापूरातील कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या (दि. १६ फेब्रुवारी २०१५) प्रकरणांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली होती. या तपासात एकदम असा टर्न झाला की यामध्ये प्रमुख संशयित म्हणून सांगलीतील विकास चौकातील समीर गायकवाडचे नाव आले.
हे नाव समोर येताच (१६ सप्टेंबर २०१५) सांगली पोलीसदल अलर्ट मोडवर आले. पहाटेच्या सुमारास जवळपास १० अधिकारी आणि ५० हून अधिक पोलीसांनी त्याच्या घरावर छापासत्र राबविले. गायकवाड कुटुंबातील दोन महिलांचे जबाब घेण्यात आले. अनेक महत्वपुर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली. जवळपास चार बॅगा आक्षेपार्ह कागदपत्रे पंचनामा करून जप्त केली गेली होती. सलग दहा दिवस या विकास चौकाला छावणीचे स्वरूप होते. ११ वर्षे झाली त्याला. समीरच्या मृत्यु ने हा सगळा पट आता थांबलाय! ना कायदेतज्न पानसरेंना न्याय मिळाला ना समीरला शिक्षा लागली.
पोलीसांची पहाटेच छापेमारी
सांगलीतील विकासचौकातील त्याच्या घरात पहाटे तत्कालिन पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरिक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने येत कोणाला काही समजण्याच्या आधीच या घराची शासकीय पंचाच्या साक्षीने झडती घेतली. सकाळ झाल्यानंतर याची माहिती शेजारी-पाजाऱ्यांना समजली आणि तात्काळ ही बातमी सर्वत्र पसरली आणि लोकांची गर्दी होवू लागली.
अधिकचा फौजफाटा आणला आणि समीर गायकवाड घराची गल्लीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. याप्रकरणानंतर सांगलीतील सनातन संस्थेच्या साधकांच्याकडेही संशयाने पाहिले जावू लागले. तसेच याप्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात आली. समीर यांच्यासंबधित असणाऱ्या सर्वांची चौकशी झाली. समीर याच्या कुंटुंबांतील सदस्यांचीही अनेकवेळा चौकशी करण्यात आली होती. पण समीर याला जामीन मिळाल्यानंतर मात्र या प्रकरणांचा बोलबाला कमी झाला.
त्याचा अचानक मृत्यू झाल्यानेचसांगलीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या २० जानेवारी २०२६ रोजी सांगली येथे हृदयविकाराच्या झटक्याने समीर गायकवाडचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
गायकवाड हा ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असल्याने त्याच्या मृत्यूमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर याचा नेमका काय परिणाम होणार, उर्वरित आरोपींच्या खटल्याची दिशा कशी ठरणार आणि तपासाला कोणते वळण मिळणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणाचा निकाल कधी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अनेक तर्क-वितर्क लढवण्यात आले
या प्रकरणांचा तपास अधिक खोलात जात असताना गायकवाडवर सह-सुत्रधार म्हणून आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाने शस्त्रसाठा, कटकारस्थान, बैठका आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच प्रकरणाची सुनावणी विविध कारणांमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिली.
२०१७मध्ये न्यायालयाने समीर गायकवाडला जामीन मंजूर केला. त्यानंतर तो बाहेर राहून न्यायालयीन सुनावणीस नियमित हजर राहत होता. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत एसआयटी कडून तपास सुरू असतानाही या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलेला नव्हता. दरम्यान, आरोपींच्या भूमिकेबाबत, कटकारस्थानाच्या व्याप्तीबाबत आणि तपासाच्या गतीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत होते. पानसरे कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांकडून न्यायासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती.