For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार मतदारसंघातून समितीने निवडणूक लढवू नये!

09:21 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार मतदारसंघातून समितीने निवडणूक लढवू नये
Advertisement

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मत व्यक्त

Advertisement

खानापूर : कारवार मतदारसंघाचा विचार करता समितीचे अस्तित्व हे खानापूर तालुका मर्यादित असल्याने, तसेच यापूर्वी झालेल्या समिती आमदारांच्यावेळी खानापूर समितीने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय कधीच घेतलेला नाही. त्यामुळे कारवार मतदारसंघात निवडणूक न लढवणे हेच समितीच्या हिताचे ठरेल, असे वक्तव्य माजी आमदार दिगंबर पाटील यांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला तालुक्यातील समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनेकांनी आपले विचार व्यक्त केले असून येत्या काही दिवसांत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

कारवार लोकसभा निवडणूक लढवून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व पुन्हा दाखवण्यात यावे, असा विचार काही जणानी व्यक्त केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने याबाबत बैठक बोलावून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंगळवार दि. 26 रोजी समितीची जाहीर बैठक घेऊन कार्यकर्त्यांनी विचार मांडावेत, असे आवाहन केले होते. या अनुषंगाने आजच्या बैठकीत रामचंद्र गावकर, रणजित पाटील, डी. एम. गुरव, पुंडलिक पाटील, विठ्ठल गुरव, रविंद्र शिंदे, जयराम देसाई यांनी निवडणूक लढवण्याबाबत कोणताही घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, तसेच कारवार मतदार संघ हा भटकळ, होन्नावरपर्यंत पसरलेला असून यात आठ मतदारसंघ येत आहेत. खानापूर आणि हल्याळ सोडल्यास मराठी भाषिक नगण्य आहेत. तसेच असलेले मराठी भाषिक अन्य पक्षाशी जोडले गेले असल्याने निवडणूक लढवून आपले सामर्थ्य दाखवता येणार नाही. यासाठी निर्णय घेताना सारासार विचार करण्यात यावा, असे विचार अनेकांनी व्यक्त केले.

Advertisement

यावेळी प्रकाश चव्हाण म्हणाले, कारवार मतदारसंघातून मराठा आणि मराठी भाषिक हे इतर पक्षाशी जोडले गेल्याने खानापूर वगळता समितीशी कोणीही बांधील नाही. त्यामुळे कारवार मतदारसंघात समितीच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणे हे योग्य होणार नाही. समितीच्या अस्तित्वासाठी कारवार मतदारसंघात निवडणूक लढवून कार्यकर्त्यांना वेठीस धरुन शक्ती वाया घालवणे योग्य होणार नाही. त्यापेक्षा निवडणुकीनंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रात पाठपुरावा करणे योग्य राहील, निवडणूक लढवण्यास माझा विरोध आहे. पांडुरंग सावंत म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवून समितीचे अस्तित्व दाखवणे काळाची गरज आहे. मात्र महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्याने आमचे नेते शरद पवार हे महाविकास आघाडीशी बांधील आहेत. त्यामुळे जर पवार साहेबांकडून दबाव आल्यास आम्हाला माघार घ्यावी लागेल, त्यावेळी नामुष्की ओढवेल. यासाठी योग्य विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत विचार मांडले. असे असताना समितीच्या तालुका अध्यक्षांनी निवडणूक संदर्भात पत्रकाद्वारे दोन दिवसात इच्छुकांचे अर्ज मागवून निवड प्रक्रिया जाहीर करण्याचे ठरल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतून संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.