अंगावर ताडपत्री, गुडघ्यात मान घालून 30 तासांचा चित्तथरारक प्रवास!
आफ्रिकेतून सुटकेचा 27 दिवसांचा थरार, अपहरण झालेल्या समीन मिरकरची कहाणी
By : प्रवीण जाधव
रत्नागिरी : आफ्रिकेच्या जंगलात सुमारे 27 दिवस सुटकेसाठी घालवलेला प्रत्येक क्षण मरण यातनेपेक्षा कमी नव्हता. ठिकाणाची माहिती समजू नये यासाठी 30 तास गुडघ्यामध्ये मान घालून व अंगावर ताडपत्री टाकून करावा लागलेला प्रवास भयंकर होता. कचऱ्यासारखा तांदूळ खाऊन काढलेले दिवस आणि सातत्याने कुटुंबाची येणारी आठवण काजळाचा ठोका चुकवून जात होती. बोटीने जंगलमय बेटावर नेऊन एका फळीवर तलवारी, चाकू, बंदूकधारी 7 चाच्यांच्या खड्या पहाऱ्यात ठेवण्यात आले हेते. आता वर्षभर सुटका होणार नाही अथवा जीवाचे काहीतरी बरेवाईट होईल, अशी पाल मनात चुकचुकली. हा थरारक अनुभव आफ्रिकेत समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या व सुटका होऊन परतलेल्या रत्नागिरीच्या समीन जावेद मिरकर याने ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना कथन केला.
रत्नागिरीतील मजगांव रोड येथे वास्तव्य करणारा समीन हा मालवाहू जहाज कंपनीमध्ये कामाला आह़े 17 मार्च रोजी तो आफ्रिकेतील लोमे येथून बिटुमेन (डांबर) भरलेले जहाज घेऊन दुआला येथे जात होता. या बोटीवर एकूण 18 जण प्रवास करत होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास समुद्री चाच्यांनी त्यांच्या बोटीवर हल्ला केला. काही समजायच्या आतच चाच्यांनी बोटीमध्ये प्रवेश केला. 9 जणांच्या या टोळीने सराईतपणे बोटीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला.
अन् सीटाडेल ऊमचा दरवाजा चाचांनी फोडला...
समुद्री चाचा एका लहान बोटीमधून जहाजापर्यंत आले होते. बोटीवर चढण्यासाठी चाचांनी आपल्यासोबत एक शिडी आणली होती. या शिडीचा वापर करून हे चाचा बोटीवर चढले. त्यांच्याजवळ मोठ्या बंदुका, पिस्तुल, चाकू, तलवारी आदी हत्यारे होती. समुद्री चाचांनी हल्ला झाला असून त्यांनी बोटीमध्ये प्रवेश केला हे समजताच आम्ही स्वत:ला बोटीवर असलेल्या सीटाडेल रुममध्ये बंद करून घेतले. तसेच जहाजावरील कॅमेरे मोबाईलला कनेक्ट असल्याने चाचांचे लोकेशन आम्ही पाहत होतो. सीटाडेल रुम अपहरण झाल्यास लपण्यासाठी बनविण्यात येतो, या रुमचा दरवाजा लोखंडी व अतिशय मजबूत बनविण्यात येत असल्याने त्याला तोडणे शक्य नसत़े. मात्र या जहाजाचा दरवाजा बसविण्यात काही त्रुटी राहिल्याने केवळ 15 मिनिटात चाचांनी हा दरवाजा फोडला. तसेच आपले फुटेज मिळू नये यासाठी चाचांनी सीसीटीव्ही देखील फोडले.
30 तासांचा असह्य प्रवास
चाचांनी बोटीवरील खलाशांना ताब्यात घेतल्यानंतर सर्वांना एका लहान बोटीमध्ये मान खाली घालून बसविण्यात आले. जराही हालचाल केल्यास समुद्री चाचांकडून मारहाण करण्यात येत होती. तर आम्हाला नेमके कोणत्या ठिकाणी नेले जात आहे हे समजू नये यासाठी सर्वांच्या अंगावर एक ताडपत्री टाकण्यात आली होती. कडक ऊन आणि त्यात अंगावर ताडपत्री टाकल्याने अंगाची पुरती लाहीलाही होत होती. या काळात पिण्यासाठी पाऊचमधले पाणी देण्यात येत होते. 30 तासांचा हा प्रवास मरण यातनांची जाणीव करून देणारा असाच होता.
वास्तव्यासाठी जंगलमय भागात नेले
लहान बोटीतून उतरल्यानंतर अपहरण केलेल्या सर्वांना एका जंगलमय बेटावर नेण्यात आले. याठिकाणी पाणी असल्याने बांबूवर फळी टाकून बसण्यासाठी जागा करण्यात आली होती. त्यावर सर्व खलाशांना बसण्यास सांगण्यात आले. याठिकाणी 7 जणांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता. त्यांच्याकडे तलवारी, चाकू, बंदुका अशी हत्यारे होती. सर्व चाचा एकमेकांशी स्थानिक भाषेत बोलत होते. मात्र आमच्याशी ते इंग्रजीत बोलत होते. खाण्यासाठी सकाळी ब्रेड, मॅगी दिली जात होती. तर जेवणात कचऱ्यासारखा भात दिला जात होता, असे समीनने सांगितले.
लवकर सुटण्याची आशा नव्हती
समुद्री चाचांनी पैशासाठी अपहरण केले असल्याचे आम्हाला समजून आले होते. त्यामुळे पैशाच्या वाटाघाटी करण्यास वेळ जाईल़ तसेच तब्बल 10 दिवसानंतर चाचांनी अपहरण केल्याचे कंपनीला कळविले होते. त्यामुळे आमची सुटका लवकर होणार नाही असेच वाटत होते. सुदैवाने लवकर निर्णय झाल्याने आमची सुटका झाली. अन्यथा वर्षभर सुटका होणार नाही अथवा जीवाचे काहीतरी बरेवाईट होईल अशी पाल मनात चुकचुकत होती.
अखेर सुटकेचा दिवस उजाडला
समुद्री चाचा आपल्याला अन्य कुठेतरी नेत आहेत एवढेच आम्हाला माहिती होते. मात्र ते आपली सुटका करत आहेत हे आम्हाला कुणालाही माहिती नव्हते. बांधकांमध्ये 7 भारतीय होते. 12 एप्रिल रोजी चाचांनी सर्व बंधकाना लागोस येथे आणून सोडले. याठिकाणी कंपनीचा माणूस नेण्यासाठी आला होता. याठिकाणाहून विशेष विमानाने सर्वांना इस्तांबूल येथे आणण्यात आले व त्याठिकाणाहून थेट मुंबईत पोहोचलो. चाचांनी अपहरण करताना आमच्याकडील मोबाईल, घड्याळ, पैसे सर्व काही नेले होते. त्यामुळे आमच्याकडे अंगावरील कपड्यांशिवाय काहीच नव्हते. त्यामुळे कुणाशी संपर्क करण्याचा प्रश्नच नव्हता. आता रत्नागिरीत घरी आलो असलो तरी त्या दिवसांची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतोय, असे समीन म्हणाला.
मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार
समीन याचे वडील जावेद यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले की, मुलाच्या सुटकेसाठी त्यांची कंपनी, जनरल शिपींगचे डायरेक्टर, पालकमंत्री उदय सामंत या सर्वांनी आमची साथ दिली. आम्हाला एक मोठा लढा लढावा लागणार असे सुरुवातीला वाटले होते. मात्र सर्वांच्या प्रयत्नांनी मुलाची लवकर सुटका झाली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.