शाहू महाराजांना बाजूला करण महाराष्ट्राला न पटणारी गोष्ट: संभाजीराजे
कोल्हापूर
कोणत्याही राज्याला इतका इतिहास नाही जितका इतिहास महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. भाजपने जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली, हे चालणार नाही. अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. भारतीय जनता पक्षातर्फे सरकार स्थापनेसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये राजर्षि शाहू महाराजांच्या फोटोचा समावेश नाही. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी. निवडणुकीमध्ये हार जीत होत असते देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्र सुपर पॉवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे नवीन महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा ही माझी अपेक्षा आहे. ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. केंद्रात आणि राज्यात आता तुमच्याकडे सत्ता आहे त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक प्राधान्याने सोडवावे. जे जे शब्द दिले होते ते आता त्यांनी पुन्हा एकदा सोडवावे. मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकवणार हे सरकारने सांगावे. ते टिकणार नसेल तर मग मराठा समाजाला कसे आरक्षण देणार हे सांगणे गरजेचे आहे. माझा काही सल्ला मागितला तर याबाबत मी सल्ला द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वेळेला वकील न दिल्यामुळे आरक्षण उडालं. दोनदा एससी, बीसी आरक्षण उडाल्यामुळे तिसऱ्यांदा कशा पद्धतीने टिकेल हे मराठा समाजाला सांगितलं पाहिजे. सगळ्या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पाच वर्षे आहेत तर ताकतीन हा मुद्दा मांडला पाहिजे. तिसरी आघाडी चिंतन करूनच आता पुढे जाईल. बच्चू कडू यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा देखील पराभव झाला. विकासाचं राजकारण करायचं आहे ही भूमिका घेतली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र उंचीवर आहे त्या महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेलं पाहिजे. टॅगलाईनच्या माध्यमातून धर्माधर्मात जाती जातीत ते निर्माण करणे हे वाईट आहे. मोठ्या पुढार्यांना असं बोलणं शोभत नाही.
सगळ्या गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण झाला आहे ते निघालं पाहिजे. कोणत्याही धर्माचं अतिक्रमण असेल तर ते काढलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवर अतिक्रमण होता कामा नये. शपथविधी सोहळ्याला मला निमंत्रण आहे मात्र प्राधिकरणाच्या बैठकीमुळे मला जाता येणार नाही, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले.