सहकाराशिवाय समाजाचा उद्धार अशक्य
डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन : मराठा बँकेच्या आठव्या शाखेचे थाटात उद्घाटन
बेळगाव : मागील 82 वर्षांपासून मराठा को-ऑपरेटिव्ह बँक सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे संचालक, सभासद, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बँकेने प्रगती साधली आहे. अशा सहकार क्षेत्रातील बँकांमुळेच सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राची प्रगती होऊ लागली आहे. सहकाराशिवाय समाजाचा उद्धार शक्यच नाही, असे उद्गार केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी काढले. मराठा को-ऑप. बँकेच्या आठव्या शाखेचे उद्घाटन शुक्रवारी गणेशपूर रोड, बेळगाव येथे थाटात करण्यात आले. यावेळी ते उद्घाटन करून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. प्रा. आनंद मेणसे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, समिती नेते आर. एम. चौगुले, संचालक लक्ष्मण होनगेकर, बाळासाहेब काकतकर, बाळाराम पाटील उपस्थित होते. प्रारंभी बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, सहकार चळवळीमुळेच आज अनेक क्षेत्रात उलाढाली वाढल्या आहेत. साखर कारखाने त्याचेच एक उदाहरण आहे. देशात आज सहकारी बँकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्पर्धेच्या युगात मराठा बँकेने आपली घोडदौड कायम राखली आहे. समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. जुन्या काळी शिक्षणाला महत्त्व अधिक दिले जात नव्हते. मात्र, अलीकडे ग्रामीण भागातदेखील शिक्षणाची जागृती झाली आहे. त्यामुळे शिक्षण सर्वत्र पोहोचले आहे. यावेळी प्रा. आनंद मेणसे यांनी देखील मराठा बँकेच्या प्रगतीबाबत गौरवोद्गार काढले. त्याबरोबर समिती नेते आर. एम. चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी अतिवाडकर, शिवाजी बाडीवाले, बाळासाहेब चोपडे, सुरज रेडेकर, हेमंत पाटील, डी. बी. पाटील यांसह इतर व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी संचालक रेणू किल्लेकर, बी. एस. पाटील यांच्यासह संचालक, सभासद, हितचिंतक, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.